बांदा नट वाचनालयाचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार आशुतोष भांगले यांना जाहीर

बांदा ता.१३-:* बांदा नट वाचनालयातर्फे देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार बांदा येथील युवा साहित्यिक आशुतोष भांगले यांना जाहीर करण्यात आला आहे. नट वाचनालयातर्फे दरवर्षी १४ फेब्रुवारीला कै. प्र. श्री. नेरुरकरांचा जन्मदिन साजरा केला जातो. यावर्षी त्यांचा शताब्दी जयंती सोहळा आहे. वाचनालयात सोमवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात आशुतोष भांगले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

बांदा येथील आशुतोष भांगले हे लेखक तसेच कवी आहेत. त्यांनी अनेक कविता, कथा तसेच लेख लिहिले आहेत. १९९६ मध्ये दै. महाराष्ट्र टाईम्सने घेतलेल्या लेख स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या ‘भारत २०४७’ या लेखाला पारितोषिक प्राप्त होऊन तो लेख मटाच्या दिवाळी अंकात समाविष्ट झाला होता. म.टा.चे कार्यकारी संपादक अशोक जैन यांनी पत्राद्वारे त्यांचे कौतुक केले होते.

आशुतोष भांगले यांनी लिहिलेल्या ‘स्वातंत्र्य त्यांचेही’ या विज्ञान कथेला मराठी विज्ञान परिषदेचे पारितोषिक मिळाले होते. त्यांचे अनेक लेख, कथा, कविता विविध वृत्तपत्रे, पुरवण्या, मासिके, दिवाळी अंकात प्रसिद्ध होत असतात. विविध कवी संमेलनात त्यांनी सहभाग घेतला असून सरस्वती वाचनालय पणजी, अक्षरसिंधु कणकवली, किरात, नवांकुर आयोजित विविध काव्य, कथा व लेख स्पर्धांत त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. बांदा येथील दीपावली शो टाईमच्या आरंभी सादर होणाऱ्या दरवर्षी नव्या नव्या शीर्षक गीतांचे गीतकार आशुतोष भांगले होते. तसेच दीपावली शोटाईमच्या वार्षिक अंकासाठी लेखन व अंकाचे संपादन ते करीत. कवी स्वामीदास या नावाने विविध धार्मिक गीते, अभंग, गजर व आरत्या लिहील्या आहेत. त्यांनी लिहिलेले श्री बांदेश्वर, श्री विठ्ठल, बांद्याचा बाप्पा आदींवरील गजर प्रसिद्ध आहेत. संत सोहिरोबानाथांची आरती त्यांनी लिहिली आहे. त्यांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थांवरील अभंग प्रसिद्ध गायक स्व. चंद्रशेखर भिडे यांनी चालबद्ध करुन गायिले होते. प्रा. द. अ. आंबिये यांनी संपादित केलेल्या संत सोहिरा पद दर्शन या पुस्तकाच्या आधारे नाथांचे अभंग निरुपणासहीत समाज माध्यमाद्वारे सर्वदूर पोहोचविण्याचे बांदा सोहिरा मठाचे कार्य सुरु असून ते लिखाण, संपादन व प्रसाराचे काम आशुतोष भांगले करतात.

बांद्यातील पत्रकारांचा अभिनय असलेल्या ‘लाईट कँमेरा एक्शन बांदा’ या वेब सिरिजचे स्क्रिप्ट त्यांनी लिहिले आहे. गेली २० वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारितेत असून बांद्यातून श्री स्वामिराज मिडियाच्या माध्यमातून Sindhudurg4U या साईटद्वारे १३ वर्षांपुर्वीच त्यांनी सिंधुदुर्गात सर्वप्रथम ई पत्रकारितेचा शुभारंभ केला. ही बांदावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. नट वाचनालयासह अनेक संस्था तसेच श्री बांदेश्वर मंदिरासह अनेक मंदिरे व बांद्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या १३ वर्षांपुर्वीच्या बातम्या त्यांच्या साईटवर आजही उपलब्ध आहेत. स्वतोपदेश हा त्यांचा ब्लॉग असून ते त्यावर सातत्याने लिखाण करतात. या ब्लॉगवर कोरोनाच्या आरंभ काळात कोकणची माणसे व मुंबईवाले यांतील वाढत्या मतभेदांवर समन्वय साधणारा त्यांचा लेख खुप गाजला व प्रशंसेस पात्र ठरला. बांदा प्लसच्या माध्यमातून त्यांनी बांद्याला जगाशी जोडलेले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page