कणकवली ता.१०-:* कासार्डे तांबळवाडी येथे श्री आवळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा झाला आहे. कासार्डे तांबळवाडी प्राथमिक शाळा ते श्री आवळेश्वर मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वाडीतील महिलांनी डोक्यावर कलश घेऊन ‘हर!हर! महादेवचा जयघोष व ढोलताशांच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यात कलशासाठी आकर्षक सजावट केलेला रथ व विविध वेषभुषा केलेले युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवतांना आवाहन, पुण्याहवाचन, वास्तूहोम, अभिषेक, कलशारोहन व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.मोठ्या भक्तिभावाने महाआरती संपन्न झाली.यानंतर याठिकाणी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री गांगेश्वर नवतरुण मित्र मंडळ, कुणकवण यांच्या ढोल पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.त्यानंतर महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. या मंदीर परिसरात छोट्या मुलांसाठी मोफत लावण्यात आलेल्या जंम्स सर्कल व खेळण्याचे साहित्य छोट्या मुलांसाठी पर्वणी ठरले.माहेरवासनी व स्थानिक महिलांचा फुगड्यांचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवर, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी बुवा विजय श्रीधर पाताडे व बुवा रविंद्र उर्फ बाळा पाटील यांच्या सूस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जि.प.सदस्य संजय देसाई, संजय संभाजी पाताडे , उद्योगपती गोपालशेठ बांदिवडेकर शांतिनाथ लडगे, दिपक पाताडे, रवींद्र पाताडे, संजय पाताडे,संतोष पारकर, उपसरपंच बाबू पेडणेकर,ग्रामसेवक शिवराज राठोड, चंद्रकांत पाताडे,निळकंठ पाताडे,श्रीराम विभुते, तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार पाताडे, नारायण घाडी,प्रणिल शेट्ये, शेट्ये गुरूजी, ग्रामसेवक प्रविण कुतरकर ,दिपक गायकवाड व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवराचा ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यांनतर बुवा गणेश जांभळे, बुवा संदीप पुजारे व बुवा संतोष जोईल यांच्यात आमने-सामने तिरंगी भजनाचा जंगी सामना रंगला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ग्रामसेवक निलेश पाताडे व प्रा.विनायक पाताडे यांनी केले. हा सोहळा संपन्न होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, मुंबई मंडळ, महिला मंडळ व श्री आवळेश्वर क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
