जठारांची अवस्था अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी:खासदारकीचे तिकीट मिळण्यासाठी उचलतात राणेंची तळी
कणकवली 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेली टीकात्मक विधाने आठवावीत. प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करत आहेत. रिफायनरी पूर्ण होण्यासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणेंना खुश करण्याचे प्रयत्न जठार करत आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हैशी जठार विसरलेत. खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार राणेंची तळी उचलत आहेत.असा टोला जिल्हा बँक माजी अध्यक्ष ,शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,राजू राठोड, उपतालुकप्रमुख राजू राणे, नगरसेवक कन्हैया पारकर,शहरप्रमुख शेखर राणे,सिद्धेश राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले,प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली आहे. भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी सूडबुद्धीने नितेश राणेंवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार सतीश सावंत यांनी घेतला. संतोष परबवर 18 डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर अगदी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कोर्टाला शरण गेले. नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. जर संतोष परबवर हल्ला होऊन त्याला 18 टाके पडल्यावर केंद्रीयमंत्री राणेंनी परबला खरचटले म्हटले होते तसेच नितेश राणेंना ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगु ठरू नये. जरी मी राणेंसोबत होतो तरी बेकायदेशीर कृत्यावेळी मी साथ दिली नाही. गाड्या जाळपोळ, भाजपा तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक सारख्या प्रकरणात मी सोबत नव्हतो, असे माजी जिल्हा बँक सतीश सावंत यांनी सांगितले.
प्रमोद जठार यांनी राणे विरोधात असताना नितेश राणे आणि नारायण राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय ? असा सवाल सावंत यांनी केला. तसे असेल तर आता राणेंची तळी उचलणाऱ्या प्रमोद जठार आणि जनतेची माफी मागावी, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. नितेश राणे यांनी केलेल्या राजेश कदम खून प्रकरणाबद्दल केलेले आरोप मान्य आहेत का?नितेश राणे दहशतवादी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप जठार यांनी केला होता,त्या राणे कुटुंबियांवरील आरोपांचा अहवाल जठारांच्या हस्ते प्रसिद्ध करुयात,त्यामूळे प्रमोद जठारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नितेश राणेंची तळी उचलू नये,असा टोला शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला. प्रमोद जठार यांचा आत्मा हा रिफायनरी मध्ये अडकला आहे.राणे कॉग्रेसमध्ये होते तेव्हा कॅन्सर होतो ही विधाने आहेत.राणेंसोबत राहिल्यास रिफायनरी होईल असे जठार यांना वाटते.गेल्या आठ वर्षात नितेश राणे यांनी किती व कोणत्या योजना आणल्या आहेत.त्याचे उत्तर नितेश राणे यांच्यावतीने सांगावे.लोकसभेला उमेदवारी मिळेल या उद्देशाने प्रमोद जठार त्याची बाजू घेत आहे.नितेश राणे यांची बाजू घेतल्यास प्रमोद जठार यांच्याबद्दल जी जनतेमध्ये काही सहानभूती आहे ती राहणार नाही असे सतीश सावंत यांनी सांगितले.
