वेंगुर्ला प्रतिनिधी– वीजेच्या कमी दाबामुळे तुळस सावंतवाडा ते चुडजीवाडीपर्यंतच्या वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असून या परिसरात त्वरीत नव्याने ट्रान्स्फार्मर न बसवल्यास येत्या २६ जानेवारी रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यकारीसह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
नदीवरील शेतीपंप, तुळस नळपाणी पुरवठा योजनेचा २० एच.पीचा विद्युत मोटरपंप, घरगुती विद्युत मीटर, व्यावसायिक मीटरची संख्या लक्षणीय असून एकाच ट्रान्स्फार्मरवर कार्यान्वित आहेत. त्यामुळे सदर ट्रान्स्फार्मरवरुन पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने इलेक्ट्राॅनिक जळून वीजग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. असे प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरु आहेत. येत्या २५ जानेवारीपर्यंत या परिसरात नव्याने ट्रान्स्फार्मर बसवण्याची कार्यवाही न झाल्यास हा इशारा देण्यात आला आहे. त्याच्या प्रती खासदार, पालकमंत्री, आमदार, जिल्हा पोलिस अधिक्षक, विज मंडळाचे कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व वेंगुर्ला पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
