आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई चव्हाण यांनी दिली माहिती
*⚡कणकवली ता.२०-:* एसटी कर्मचार्यांच्या महामंडळाचे शासन विलिनीकरणाची मागणी आणि शेतकरी, कष्टकरी आदींच्या प्रश्नांसंदर्भात आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार दि. २२ डिसेंबरला सकाळी दहा वाजता मुंबईतील मंत्रालयावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोटेपाटील यांच्या नेत्तुत्वाखाली प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष गणपत उर्फ भाई चव्हाण यांनी येथे दिली.
या आक्रोश मोर्चा संदर्भातील निवेदन १७ डिसेंबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री अँड. अनिल परब, ग्रुहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्यासह राज्याच्या सर्वं मंत्र्यांसह २८८ सर्वंपक्षिय आमदार, पोलीस महासंचालक आदींना सादर केले आहे. दरम्यान या आक्रोश मोर्चाची शासन आणि पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्य पोलीस महासंचालक विश्वास नागरेपाटील यांच्यासह मुंबई पोलीस कमिशनर आदींनी गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान ही संघटना गेली २७ वर्षें सामाजिक क्षेत्रात विविध यशस्वी आंदोलनांच्या माध्यमातून राज्यासह अन्य काही राज्यांत कार्यरत आहे. सद्या या संघटनेने या आक्रोश मोर्चाच्या नियोजनाच्या अनुषंगाने अँड. रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुगल मिट, फेसबुक मिट, झुम मिटिंग आदीद्धारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे. संघटनेने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या आक्रोश मोर्चाच्या निवेदनात एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत दुखवटा संपाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाचे त्वरीत शासनात विलिगीकरण करावे, आत्महत्याग्रस्तांना हिवाळी अधिवेशनात कर्मयोद्धा संबोधून अभिवादन करावे, त्यांच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, या कालावधीत कर्मचार्यांवर आकस बुध्दीने केलेल्या कारवाया मागे घ्याव्यात, संपकालिन वेतन शासकीय कर्मचार्यांप्रमाणे द्यावे, तसेच परिवहन मंत्र्यांनी कर्मचार्यांची जाहीर माफी मागावी अशा संपाच्या अनुषंगाने मागण्या केल्या आहेत. तसेच एस. टी. महामंडळाच्या तोट्यास कारणीभूत असलेल्या प्रशासकीय वरिष्ठ नोकरशहाच्या भ्रष्टाचारी कंत्राटी कारभाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषीच्या मालमत्ता जप्त कराव्यात, एस. टी. बँकेच्या गैरकारभारविरुद्ध सीबीआय चौकशी करून दोषीच्या मालमत्ता जप्त कराव्यात, बीओटी तत्वावर नियमबाह्य दिलेल्या मोकळ्या जागावरील करार रद्द करावेत, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकरी, कष्टकरी , मजूर आदींवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध स्वतंत्रपणे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. त्यामुळे या आक्रोश मोर्चात हा वर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे.
