भाजप सरपंच आंदोलन ठरले लक्षवेधी

घर परवानगी व स्ट्रीट लाईट बिल बाबत वेधले प्रशासनाचे लक्ष

सिंधुदुर्गनगरी ता १६ घर बांधकाम परवानगीच्या जाचक अटी , ग्रामीण भागातील खड्डेमय रस्ते, ग्रामीण भागातील पथदिव्याची थकित बिले , तसेच जिल्हा नियोजन कडून प्राप्त होणारा निधीचे असमान वाटप याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग भाजप सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. तर शासन विरोधी जोरजोरात घोषणा देत परिसर दणानून सोडला. ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या विविध प्रश्ना बाबत जिल्ह्यातील भाजपाची सरपंच संघटना राज्य शासनाच्या विरोधात आक्रमक बनली आहे. ग्रामीण भागातील घर परवानगी व स्ट्रीट लाईट बील ,जिल्हा नियोजन निधीचे असमान वाटप असे विविध विषय घेऊन आज भाजपच्या सरपंच संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. मोठ्या संख्येने जमलेल्या सरपंच तसेच भाजप च्या पदधिकाऱ्यानी राज्य शासन तसेच पालकमंत्री यांच्या विरोधात जोरजोरत घोषणा देत सिंधुदुर्गनगरी परिसर दणानून सोडला. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी याना देण्यात आलेल्या निवेदनात ग्राम पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी पथदिवे बसविले आहेत. याची येणारी विद्युत बिले राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग भरत होता. परंतु एप्रिल २०१९ नंतरची बिले भरण्यास शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे ही वीज बिले थकली होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीने सप्टेंबर पासून पथदिवे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थी व दिवाळी कालावधीत दिवाबत्ती बंद होती. ग्रामीण घर बांधणी परवानगीचे अधिकार पूर्वी ग्राम पंचायतीकडे होते. २०१६ पासून हे अधिकार महसूल विभागाकडे देण्यात आले. याबाबत पुन्हा आदेश काढत ग्राम पंचायतीला प्राधिकरण म्हणून नियुक्त करीत प्रचलित नियमानुसार घर परवानगी देण्याचे अधिकार दिले. परंतु परवानगीसाठी आवश्यक असलेले कागद क्लिष्ट असल्याने जिल्ह्यातील हजारो ग्रामीण घरांच्या परवानग्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्ते खराब झालेले असताना जिल्हा नियोजन कडून निधी दिला जात नाही. दिलेला निधी समप्रमाणात नाही, असे नमूद केले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आज रोजीच्या नियोजन सभेच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेल्या पालकमंत्री,खासदार ,आमदार यांचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून भाजप सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. तसेच ३० नोव्हेंबर पूर्वी यावर ठोस उपाययोजना केली गेली नाहीतर याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी पणदूर सरपंच तुकाराम साईल, रुपेश कानडे, नागेश परब, प्रशांत बोडेकर यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो भाजप सरपंच सहभागी झाले होते. तसेच या आंदोलनाला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती अंकुश जाधव, महेंद्र चव्हाण, शर्वानी गावकर ,अनिशा दळवी, जि प गतनेते रणजित देसाई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटया सावंत मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होत जाहिर पाठिंबा दिला.तर जनतेच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद नेहमी पाठीशी राहील असे यावेळी अध्यक्ष संजना सावंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सरपंच संघटनेच्या वतीने तसेच नेरूर घाडी वाडी ग्रामस्थ ,जिल्हा दूध संघ यांच्या वतीने आपल्या मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषने झाली या उपोषण कर्त्यांची पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राउत, आमदार वैभव नाईक, तसेच आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली .त्यांचे प्रश्र जानून घेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आस्वासन दिले तर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनीही उपोषण कर्त्याची भेट घेत आपल्या समस्या व मागण्या बाबत पाठपूरावा केला जाईल व आपले प्रश्र सोडवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आस्वासन दिले.

You cannot copy content of this page