जबरदस्त इच्छाशक्तीपुढे संकटांवरही तिन्हे मात केली

जिल्ह्याच्या पहिल्या पोस्ट वुमन सरोजताई तेली यांचा थक्क करणारा प्रवास;तारुण्यात वैधतव्य:दोन लहान मुले:आभाळभर संकटे झेलत उभी राहिलेली स्त्री शक्ती

*⚡सावंतवाडी ता.०९ प्रसन्न गोंदावळे-:* ऐन तारुण्यात पदरी वैधव्य आलं.  कमी वयात संसाराची जबाबदारी,  पदरात तीन कोवळी मुलं, पतीच्या आकस्मित निधनानंतर लहान मुलाचं निधन… अशी एक न एक आभाळा एवढी दुःख कोसळत असताना देखील आपल्या लहान दोन मुलींसाठी कंबर कसून, सासरच्या लोकांचा बाहेर काम करण्यासाठी असलेला विरोध न जुमानता उभा राहिल्यात त्या स्त्री शक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात पहिल्या पोस्टवुमेन श्रीमंती सरोजताई तेली.लहान वयातच संसाराची जबाबदारी अंगावर पडली. या संसाराची स्वप्न रंगवत असतानाच पतीचे कावीळ सारख्या आजाराने आकस्मित निधन झाले. अवघा पाच वर्षांचा संसार पदरात तीन कोवळी मुल. पतीच्या अकाली निधनाने समोर दिसत होता तो दुःखाचा डोंगर. संसाराला हातभार लावायला कोणाचीच मदत नाही. माहेरची परिस्थिती देखील बेताचीच. अशातच कोवळ्या वयात लहान मुलाचे देखील निधन. नियती जशी काय परीक्षाच बघत होती या माऊलीची. परंतु, तरी देखील ही माऊली आपल्या दोन मुलींसाठी उभी राहिली. समोर दिसत होत ते काळाकुट्ट, अंधारमय भविष्य. पण या अशा कठीण काळात त्यांना एक आशेचा किरण दिसला. पती मुंबई येथे पोस्ट खात्यात नोकरीला होती. त्या जागेवर त्यांना अनुकंपा खाली नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांना तिथे नोकरी मिळाली. परंतु, यावेळी देखील त्यांच्या सासरच्या लोकांनी नोकरी करण्यासाठी विरोध केला. परंतु, या विरोधाला न जुमानता आपल्या लहान मुलांसाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण, मुंबईसारख्या नवख्या शहरात आपल्या मुलांसह राहून नोकरी करणे त्यांना कठीण जात होते. यातच सावंतवाडी पोस्ट ऑफिस मध्ये जागा रिक्त झाल्याने त्यांना सावंतवाडीत पोस्टिंग मिळाली.

आपल्या मुलांना चांगले भविष्य मिळावे यासाठी त्या रोज ३०० ते ४०० पत्र पाई चालत त्या घरोघरी पोहचवत होत्या. सतत फिरत क्षेत्र असल्याने केवळ पुरुषांचेच वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. 
घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने केवळ १० वी पर्यंतच शिक्षण घेतलेल्या पूर्वाश्रमीच्या वनिता वालावलकर यांनी आपल्या मुली चांगल्या प्रकारे शिकाव्यात म्हणून त्यांनी रक्ताच पाणी करत प्रामाणिकपणे काम केले आहे. आणि अजूनही काम करत आहेत. 
कोवळ्या वयातच दुःखाचे आणि संकटाचे डोंगर समोर असताना देखील चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवत त्या सर्व संकटाला धीराने सामोऱ्या गेल्या. 
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता त्या प्रामाणिक पणे आपले काम अगदी चोख पार पाडत आहेत. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेकवेळा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. रोटरी क्लब कडून त्यांना व्होकेशनल अवॉर्ड देऊन त्यांना गौरविण्यात आले.
आपल्या मुलांसाठी केलेले अपार कष्ट, सासरचा विरोध पत्करून पोस्टवुमन म्हणून काम करत त्यांनी शून्यातून आपल विश्व निर्माण केलं आहे. पोस्ट क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या स्त्री शक्तीला ग्लोबल महाराष्ट्र कडून प्रणाम…

You cannot copy content of this page