डिजिटल व्यवहार कोणत्याही कागदपत्राशिवाय होणार
*⚡कणकवली ता.०८-:* भारतामध्ये टपालखात्याची सुरुवात 01 ऑक्टोबर 1 854 रोजी झाली . आज भारतामध्ये जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत , जी गावा – गावापर्यंत आहेत . त्याद्वारे टपाल खाते जनतेची सेवा करत आहे . 09 ऑक्टोबर 1874 रोजी पोस्टाची जागतीक संघटना सुरु झाली म्हणून 09 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो . त्यापुढील आठवडाभर राष्ट्रीय डाक सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभाग डाकघर अधीक्षक ऐ. बी. कोड्डा यांनी दिली. या कालावधीत जनतेला टपाल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा बाबत जनजागृती करणे हा उद्देश आहे . यावर्षीच्या या सप्ताहाला विशेष महत्व आहे कारण भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त संपूर्ण देश आझादी का अमृतमहोत्सव साजरा करत आहे . संपूर्ण सिंधुदुर्ग विभागात 371 पोस्ट ऑफिस असून सर्व कार्यालये संगणकीकृत आहेत . आकर्षक व जलद सेवा देण्यासाठी पोस्टाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत . त्यामध्ये विविध बचत योजना , टपाल जीवन विमा आधार नोंदणी स्पीड पोस्ट , इंटरनॅशनल टपाल सेवा , बीझनेस पोस्ट , ई – पोस्ट , माय स्टँम्प , पासपोर्ट सुविधा , इत्यादी सेवांचा समावेश होतो . लवकरच शासनाच्या विविध सेवा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व कार्यालयामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु होणार आहे . टपाल खात्याची इंडिया पोस्ट पेमेंट बँक लोकांच्या सेवेसाठी सुरु करणेत आली, असून त्यातून सर्व डिजिटल व्यवहार कोणत्याही कागदपत्राशिवाय केले जातात . ज्यामध्ये पैसे पाठविणे , बील पेमेंट , आधार मोबाईल लिंक , जनरल इन्शुरन्स , हेल्थ इन्शुरन्स इत्यादी सेवा उपलब्ध आहेत . तरी जनतेने या सेवांचा लाभ घेऊन आम्हाला सेवा करणेची संधी द्यावी असे आवाहन अधीक्षक डाकघर -ऐ. बी. कोड्डा यांनी केले आहे.
