आयआरबीच्या किरणकुमार व एकनाथ जगताप यांचा शब्द
वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पात कर्मचारी भरती करताना आय.आर. बी. कंपनी स्वतः भरती करणार आहे. यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्त यांनाच प्राधान्य देण्यात येईल, अशी हमी आज आय. आर. बी. कंपनीचे श्री किरणकुमार व एकनाथ जगताप यांनी दिली. बहुप्रातिक्षित सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोंबर रोजी होत आहे. त्यामुळे विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज होत आहे. दरम्यान याठिकाणी रोजगार उपलब्ध होईल या आशेवर अनेक वर्षे परुळे, चिपी, कर्ली गावातील भूमिपुत्र आहेत. अशा वेळी जेव्हा ग्रामस्थांनी चौकशी केली तेव्हा काही जागा आधीच भरल्या गेल्याचे समजले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. तसेच यापूर्वी त्यांनी दोन वेळा विमानतळ अधिकारी यांची भेट घेऊन भरती केलेल्या मध्ये प्रकल्प ग्रस्त किती आहेत याची माहिती मिळावी अशी मागणी केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाही म्हणून ग्रामस्थांनी अधिकारी यांना तुम्ही या प्रकल्पात कोणते रोजगार उपलब्ध होणार आहेत याची स्थानिक प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे असे सांगितले. परुळेबाजार येथे आज अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांची बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आय. आर. बी. कंपनीचे श्री किरणकुमार व एकनाथ जगताप उपस्थित होते. त्यांनी सांगितले की यापूर्वी दिलेल्या सर्व कंपनीचे लायसन्स नसल्याने त्याचे करार रद्द करण्यात आले आहेत. मात्र सद्य स्थितीत उपलब्ध नोकरी ची संधी ही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार निवडून नोकऱ्या देण्यात येतील. प्रकल्पग्रस्तांनी आपले अर्ज सादर करावेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी सभेत सरपंच श्वेता चव्हाण, माजी सभापती निलेश सामंत, माजी सरपंच प्रदीप प्रभू, उपसरपंच कुशेवाडा निलेश सामंत, पोलीस पाटील सुभाष घोलेकर, प्रकाश चव्हाण, सुनील चव्हाण, शांताराम पेडणेकर, प्रसाद पाटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
