नजीक असलेल्या घराला धोका भिंत बांधण्याची माळगावकर कुटुंबाची मागणी
*⚡मालवण ता.१५-:* आचरा भगवंतगड रस्त्याला गटार नसल्याने सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे भगवंत गड येथील माळगांवकर वाड्यालगतची संरक्षक भिंत कोसळून घराला धोका निर्माण होण्याबरोबरच रस्ता ही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याची तातडीने दखल घेत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी माळगांवकर कुटूबियांनी केली आहे. भगवंत गड रस्त्यालगत साधारण पंधरा ते वीस फूट खाली माळगांवकर यांचा वाडा आहे.येथे सध्या सहा कुटुंबे वास्तव्यास आहेत. मागच्या आठवड्यात जोरदार पडलेल्या पावसाने भगवंत गड येथील डोंगर उताराचे पावसाचे पाणी रस्त्याला गटार नसल्याने थेट दुसरया बाजूची रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळून रस्त्याखाली असलेल्या माळगांवकर यांच्या वाड्यात शिरले होते.घरात दिड फूट पाणी शिरल्याने पाणी निचऱ्यासाठी माळगांवकर यांना घराच्या भिंती ला भगदाड पाडावे लागले होते.घरात पाणी घुसण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पुंडलीक दिनानाथ माळगांवकर यांनी दिली आहे.भगवंतगड रस्त्याच्या माळगांवकर यांच्या वाड्यालगतचा दहा बारा फूट लांबीचा बंधारा कोसळला असून इतरही बंधारा कमकुवत होऊन केव्हाही कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घराला धोका होण्याबरोबरच रस्त्याही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी माळगांवकर कुटुंबीयांनी केली आहे.
