प्रशासनाचे दुर्लक्ष:पंचायत समिती सभेत नाराजी
*⚡सावंतवाडी ता.२७-:* अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना देखील तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार विज पुरवठा खंडित होत आहे. रस्त्यांवर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. याबाबत वारंवार मागणी करून देखील महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने, याबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावात येणार असून, त्यांचे स्वागत या खड्ड्यांनी करायचे का? असा सवाल यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. यावेळी सभापती निकिता सावंत यांनी गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वाढलेली झाडे तोडणे यासारखी सर्व कामे करून घ्यावीत असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचायत समिती सभापती सौ. निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज पंचायत समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी उप सभापती शीतल राऊळ, नूतन गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, नितीन आरोंदेकर आणि सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
