सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लढ्याला अखेर यश…

*राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वसाधारण व मासिक सभा ऑफलाईन घेण्याची राज्य शासनाची परवानगी

*💫कुडाळ दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभेबाबत उभारलेल्या लढ्याला आज अखेर यश आले असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वसाधारण व मासिक सभा ऑफलाईन पद्धतीने सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी आज मान्य करण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वसाधारण व मासिक सभा आता ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभा या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आदेश निर्गमित केला होता. परंतु, कोरोना आजाराचा धोका कमी झाल्यानंतर देखील वारंवार मागणी करून देखील सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. या बाबत जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत तसेच स्थायी व अन्य सभांमध्ये चर्चा होऊन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सहभाग घेण्याची मागणी करण्यात आली होती. तसा ठराव देखील राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. अखेर राज्य शासनाने या ठरावाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वसाधारण व मासिक सभा या पूर्वीप्रमाणेच सभागृहात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, कोव्हिड संदर्भातील राज्य शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सभा घेण्यास परवानगी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याबाबत ग्राम विकास मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांनी अशा प्रकारच्या सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्यामुळे आता राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा आपले प्रश्न सभागृहात मांडण्याची व संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांची माहिती व उत्तरे घेण्याची संधी मिळणार आहे. याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, उशिरा का होईना परंतु जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना पुन्हा एकदा सभागृहात बसून कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लढ्याला अखेर यश मिळाले असेही ते म्हणाले आहेत. तसेच सर्व सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भातील शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page