चिपळूण व खेड येथील 500 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप
*⚡मालवण दि.०२-:* मालवण तालुक्यातील बंड्या खोत मित्र मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यात मधलीवाडी, कातरकरवाडी, रामवाडी, देऊळवाडी, भराडवाडी, बौद्धवाडी, सीमेचीवाडी, रामवाडी आदी वाड्यावर जात ही मदत वाटप करण्यात आली. मालवण तालुक्यात कालावल खाडी पात्रातील खोत जुवा बेटावर राहणारे बंड्या खोत यांनी अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. चिपळूण खेड भागात पुरामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाल्याने पुरग्रस्तांसाठी मदतीसाठी खारीचा वाटा उचलत बंड्या खोत यांनी मित्रमंडळींच्या सहकार्याने त्याभागात आवश्यक साहित्य वाटप केले. या मदत कार्यात बंड्या खोत व त्यांचे सहकारी ज्ञानेश गोलतकर, मयूर वायंगणकर, दिनेश कांबळी आदी मदत वाटपात सहभागी झाले होते. त्या भागातील मंडळ अधिकारी राजाराम घुले, तलाठी सुदिल कांबळे यांनी यावेळी दिवसभर अन्नधान्य किट वाटप करताना उपस्थित राहत सहकार्य केले.
