माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा
*⚡मालवण ता.०१-:* मालवण शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य प्रशासनाकडून लस पुरवठा कमी होत असून मालवणात आरोग्य यंत्रणेतील अधिकारीच आपल्या मर्जीतील लोकांची नावे लसीकरणच्या यादीत घुसडवून लस देत असल्याने अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहणारे नागरिक लस घेण्यापासून वंचित राहत आहेत याबाबत राज्यकर्ते सुशेगात असून नगरपालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तसे केल्यास नागरिकच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा खणखणीत इशारा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत देतानाच शासनाने मालवण शहरासाठी लसीचे जादा डोस वाढवून मिळावेत, अशी मागणी केली आहे. मालवण येथील भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, नगरसेविका सौ. ममता वराडकर, मोहन वराडकर, जॉन नरोना, आबा हडकर, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सुदेश आचरेकर म्हणाले, बहुतांश गावांची लोकसंख्या एक ते दीड हजार असताना त्या ठिकाणी लसचे १२० डोस येतात. मात्र मालवण शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजार असताना त्या तुलनेत शहरात येणारे लसचे डोस हे १३० ते १४० एवढेच येत आहेत. या डोसची ऑनलाईन नोंदणी ओपन केल्यावर काही मिनिटातच फुल होते. तर ऑफलाईन नोंदणीचे कोणतेही नियोजन नसून आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आपल्या मर्जीतील लोकांची नावे आधीच यादीत टाकून त्यांना लस देत आहेत.मालवणात तर ७० डोस शिल्लक असताना ४० लोक रांगेत असले तरी डोस संपले असे सांगितले जाते. मग बाकीचे डोस कोणाच्या घशात जातात असा सवाल सुदेश आचरेकर यांनी उपस्थित केला. या प्रकारची सखोल चौकशी करून नागरिकांना न्याय मिळावा अशी मागणीही आचरेकर यांनी केली. मालवण शहरात येणारे लसीचे अपुरे डोस आणि शहराची लोकसंख्या यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ होत आहे. तसेच हे लसीकरण आठवड्यातून तीन दिवसच होत आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्या अनेकांना मुदत संपूनही अजूनही दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे शहरासाठी दिवसाकाठी ५०० डोस उपलब्ध व्हावेत, अशी मागणीही यावेळी आचरेकर यांनी केली. मालवणची जनता कोरोनाशी लढत आहे. लसीकरण ही एकच आशा आहे. त्यामुळे खासदार, आमदार, पालकमंत्री यांनी याप्रश्नी लक्ष घालून मुबलक लस साठा उपलब्ध करावा. लस नियोजनावर पालकमंत्र्यांचे नियंत्रण नाही. शहरात एकच लसीकरण केंद्र असल्याने गर्दी व गोंधळ होत आहे. यास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे देखील जबाबदार आहेत. शहरात प्रभाग निहाय, कॉम्प्लेक्स निहाय लसीकरण करण्यासाठी नगराध्यक्षानी मागणी केली पाहिजे. मात्र याकडे नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत, अशी टीकाही आचरेकर यांनी केली.
