सलग पाचव्या वर्षी सैनिक जवानांना पाठविल्या राख्या

भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची भावनिक उपक्रम;यावर्षी पाठविल्या साडे दहा हजार राख्या

मालवण दि प्रतिनिधी बंधुप्रेमाचे अनोखे नाते सांगणाऱ्या रक्षाबंधन’ या पवित्र सणाच्या निमित्ताने देश रक्षणाचे महान कार्य करणाऱ्या भारतीय सैनिकांना स्वत:च्या हाताने राख्या बनवून पाठविण्याचा अनोखा उपक्रम भंडारी ए.सो.कनिष्ठ महाविद्यालय, मालवण मधील विद्यार्थिनींनी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही राबविला आहे. जवानांना राख्या पाठविण्याचे यावर्षी पाच वर्षे असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थीनींनी गट करून घरीच राहून तब्बल १०,५१० राख्या बनविल्या.या राख्या भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांसाठी पाठविण्यात आल्या.आज मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सपन्न झाला या उपक्रमासाठी प्रा. बांदेकर यांनी नियोजन करत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कोरोना आजाराची पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून यावर्षीही दहा हजारच्या वर राख्या बनविण्यात आल्या. यासाठी संस्था अध्यक्ष विजय पाटकर, प्राचार्य व्ही.जी. खोत, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबई चे मालक मंगेश कुलकर्णी यांचे तसेच डॉ दीपक परब यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी १०,५१० राख्या बनवून सैनिकांना पाठविल्या आहेत. यामध्ये पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपुर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लहाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही कोच्ची नेव्ही, विशाखापट्टनम, पोर्ट ब्लेयर-अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लद्दाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर इत्यादि ठिकाणी देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक डॉ दीपक परब ,मालवणचे पोस्टमास्टर सौ.मुग्धा मोहिते ,पर्यवेक्षक हणमंत तिवले, सौ राधिका परब , ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा सुनंदा वराडकर,प्रा. गुरुदास दळवी, प्रा. गणेश सावंत, प्रा. वैभवी वाक्कर, प्रा स्नेहल पराडकर, प्रभूदास आजगावकर आदी व काही निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना तहसीलदार अजय पाटणे यांनी सीमेवरील जवान हे रात्रंदिवस आपल्या सर्वांची रक्षा करीत असतात. त्यांना ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी या उपक्रमामधून गेली पाच वर्षे राख्या पाठवीत आहेत यातून तुमच्या मधील जवानांविषयी ज्या भावना आहेत त्या दिसून येतात. आतंकवादी हल्ले, नक्षलवाद यापासून आपले बचाव करण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावून काम करत असतात. या उपक्रमामुळे सैनिकांमध्ये एक वेगळी इच्छा शक्ती निर्माण होऊन ते अजून उत्साहाने सेवा बजावतील असे ते सांगितले. यावेळी प्राचार्य व्ही. जी. खोत यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी नितल भांडे, आणि चिंतनी पेडणेकर यांनी सैनिकांवरील स्वरचित कविता वाचन केले या कार्यक्रमाच्या अनुषगाने कोरोना योद्धा म्हणून मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांना यांना चैताली केळूसकर हिच्या हस्ते प्रतिकात्मक राखी बांधण्यात आली. यावेळी सर्वाधिक राख्या बनविणाऱ्या चैताली केळुसकर हिच्यासह अन्य विद्यार्थिनींना गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page