पालकमंत्र्यांची सूचना;सतीश सावंत यांनी पर्यायी व्यवस्थेची पाहणी केली
*💫कणकवली दि.२३-:* कनेडी बाजारपेटेपासून जवळच असलेल्या नाटळ मल्हारी पुलाचे पुर्न बांधकाम करण्यासाठी तब्बल दहा महिने म्हणजे मे महिन्या पर्यंतचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि अत्यावश्यक सेवेसाठी कनेडी परिसरात येणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था निर्माण करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, शाखा अभियंता श्री. पवार यांच्यासह पर्यायी व्यवस्थेची पाहणी केली आहे. नाटळ येथील मल्हारी नदीवरील ५७ वर्षे जुना पूल मुसळधार पावसात कोसळल्याने नाटळ, दिगवळे, नरडवे आणि दारिस्ते गावातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी कनेडी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. यासाठी कोणता पर्याय निर्माण करता येईल. याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी सतीश सावंत यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज भिरवंडे परतकामवाडी येथील जुना साकव आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पाणीसाठवण बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. यापैकी एखादा पर्याय हा तात्पुरता निवडता येईल का, अशाही सूचना कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. या परिसरातील ग्रामस्थांना कनेडी मध्ये शाळा, महाविद्यालयात तसेच वैद्यकीय सेवेसाठी पायी चालत येण्यासाठी हा पर्याय आहे. तसेच वाहतुकीसाठी मोटरसायकल किंवा रिक्षा कोणता पर्याय करता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान मल्हारी नदीचा पूल पुनर्बांधणीसाठी १० महिन्याचा तरी किमान कालावधी लागणार आहे. त्यामुळे मे २०२२ मध्ये हा पूल तयार करावा लागेल. मात्र, या पुलासाठी कोणतीही आर्थिक तरतूद अद्यापही झालेली नाही असे श्री. शेवाळे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडून तात्काळ निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सतीश सावंत यांनी श्री. शेवाळे यांना सांगितले असून याबाबत येत्या रविवारी पालकमंत्री श्री. सामंत यांच्याशी चर्चा करून निधीची तरतूद तसे पर्यायी रस्ता कसा उभारता येईल याबाबतही चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले. पर्यायी रस्त्याची पाहणी करण्यासाठी श्री. शेवाळे नाटळ येथे आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, भिरवंडेचे माजी सरपंच देवेंद्र सावंत, अमित सावंत, संतोष सावंत, विलास राणे, बाबन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
