कोकण किनारपट्टीवर तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत…

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

*💫वेंगुर्ले दि.०९-:* महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी आणि पालघर या कोकण किनारपट्टीवर तत्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ उभारावीत अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शासनाने कोकण किनारपट्टीवर एकूण 11 ठिकाणी अशी बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ उभारण्याचा निर्णय वर्ष 2019-20 मध्ये घेतला होता. त्यासाठी 42 कोटी 39 लाख रुपयांची तरतूदही केली होती; मात्र ठरलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीत ही निवारा केंद्र उभारली गेली नाहीत. परिणामी नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहे. घरे, फळबागा, शेती यांची अतोनात हानी झाली. ठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती ‘फना’, ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ अशा एका पाठोपाठ येणार्‍या चक्रीवादळांच्या काळात या निवारा केंद्रांचा मोठा आधार कोकणवासियांना झाला असता. तरी शासनाने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत. कोकणांतील काळेथर, आचरा, जामसंडे, विजयदुर्ग, सैतवडे, हर्णे, एडवण, दिघी, दाभोळ, बोर्ली आणि उसरणी येथे बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या ठिकाणी ही निवाराकेंद्र समयमर्यादा ठेवून तात्काळ उभी करावी. ज्याप्रमाणे चक्रीवादळाच्या पूर्वी मच्छीमारांना पूर्वकल्पना दिली जाते. त्याचप्रमाणे वादळी क्षेत्रातील फळबागायतदार, शेतकरी, व्यावसायिक यांनाही सतर्क करण्यासाठी यंत्रणा उभी करावी. जेणेकरून या वादळापूर्वी पिकांचा उतारा घेऊन या सर्वांची हानीही टाळता येईल. त्यासह चक्रीवादळांच्या क्षेत्रांत पीकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने तेथे कोणती पिके घ्यावीत, वादळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तेथील बांधकामे कशा प्रकारची असावी याविषयीही तेथील नागरिकांना मार्गदर्शन करावेे, तसेच पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत आलेल्या चक्रीवादळांची पूर्वतयारी म्हणून लक्षावधी नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर केल्याने तेथील संभाव्य जिवीतहानी टळली. त्याच धर्तीवर राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्याही श्री. घनवट यांनी या निवेदनाद्वारे शासनाकडे केल्या आहेत. तसेच या निवेदनाच्या प्रती प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही पाठविल्याचे श्री. धनवट यांनी सांगितले.

You cannot copy content of this page