कोरोनामुक्त गाव स्पर्धेपेक्षा सरपंच, उपसरपंच यांना ५० लाखाचे विमा कवच दया

मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांची मागणी

*💫मालवण दि.०४-:* राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित करून सरपंचांना ५० लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मात्र या निर्णयावर मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी टीका केली आहे. हा सरपंचांना आमिष दाखवण्याचा प्रकार असून अशी स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पैसे असतील तर कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि सनियंत्रण समितीच्या सदस्यांना शासनाने प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी पाताडे यांनी केली आहे. शासनाला स्पर्धाच ठेवायची तर मग कोरोनामुक्त जिल्हा स्पर्धा लाऊन पालकमंत्र्यांसाठी बक्षीस ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्य शासन ग्रामपंचायतला कोविडसाठी एक रुपयाचा निधी देत नाही आणि गावातील संपूर्ण जबाबदारी सरपंचावर सोपवली आहे. जिल्हापरिषदची संपूर्ण यंत्रणा वापरून जिल्हाधिकारी, प्रशासन आपली पाठ थोपटून घेण्याचे काम करत आहे. ग्रामस्तरीय कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने अघटीत घडल्यास सरपंचांना जबाबदार न धरता शासनाने संपूर्ण जबाबदारी घ्यावी. तसेच रात्रपाळीसाठी होमगार्डची तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम नियंत्रण समितीची बाजू मांडताना त्यांना विमा संरक्षण मिळावे. कोविड सेंटर साठी निधी व कर्मचारी नियुक्ती यासाठी शासनाने तरतूद करावी अशी मागणी सभापती अजिंक्य पाताडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page