शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक भूषण साटम यांचे प्रतिपादन…
⚡मालवण ता.२०-:
ब्रिटिशांच्या जुलमी शृंखलात जखडलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी
आपल्या प्राणाची आहुती देत आपल्यासमोर संघटन, कठोर राष्ट्रप्रेम, एकात्मता, शिस्तपालन, वज्रनिश्चय, गुरुजनाचा आणि आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान या सर्व गोष्टी ठेवल्या त्याच गोष्टी दुर्दैवाने लुप्त होतं आहेत.आज भारत देश पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम बनवायचा असेल क्रांतिकारकांनी आचरणात आणलेले गुण आचरणात आणावेत असे प्रतिपादन श्री शिवराज मंच अध्यक्ष आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक भूषण साटम यांनी येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मालवण येथे क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यासक आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक श्री भूषण साटम यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुनील नाईक, कट्टा केंद्रप्रमुख श्री गौरव नाईक मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री गणेश वाईरकर, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख श्री एकनाथ राऊत, प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री किसन हडलगेकर आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात श्री साटम म्हणाले, आम्हाला हे स्वातंत्र्य तयार स्वरूपात मिळाले आहे. पण या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्याचे स्मरण करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य आहे असे सांगून ते म्हणाले, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, खु्दीराम बोस, अनंत कान्हेरे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिसिह नाना पाटील, सुभाषचंद्र बोस, वि दा सावरकर, बंगालच्या शांती घोष आणि सुनीता चौधरी, नागालँडची तेरा वर्षाची क्रांतिकारक राणी गड्डम्मा अश्या अनेक क्रांतिकारांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे.. कित्येकांची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत. या सर्वांचे स्मरण करताना आज आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आज ही आपल्या देशाला क्रांतीची गरज आहे आणि त्याची सुरवात विध्यार्थीदशेमधूनच झाली पाहिजे कारण विध्यार्थीच आजच्या भारत देशाच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान देऊ शकतो असे सांगितले
यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री किसन हडलगेकर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाचे प्रमुख श्री एकनाथ राऊत यांनी केले.
