१५ दुचाकींसह कार जळून खाक:अग्निशमन यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी..
⚡मालवण ता.१४-:
मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी आज रात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून खाक झाली. यावेळी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करत तसेच नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र सर्व गाड्या जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
नगरपालिकेचा अग्नीशमन बंब उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगीची घटना समजताच नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, ललित चव्हाण, नगरसेविका पूनम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मालवण पोलीसांनीही त्याठिकाणी हजर होत माहिती घेतली.
