⚡मालवण ता.१२-:
भक्ताच्या हाकेला व नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर ख्याती असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यात होणारा सातेरीचा जत्रोत्सव यावर्षी रविवार दि. २६ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सातेरी देवस्थानच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही एकमेव जत्रा म्हणून या बिळवस श्री सातेरी देवी जलमंदिरची ख्याती आहे.
कोकण प्रांतातील एकमेव जलमंदिर म्हणून या बिळवस श्री सातेरी जलमंदिराची ख्याती जगभर पसरली आहे. सातेरी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख ठरविण्यासाठी मृग नक्षत्राच्या पाचव्या दिवशी शेतीवाडीच्या लागवडीसाठी देवी समोर अखंड नारळ ठेवून देवीला साकडे घालण्यासाठी संपूर्ण गाव सकाळच्या वेळी मंदिरामध्ये जमा होतो. गाव रहाटीची कामे झाल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र बसून आषाढ महिन्यामध्ये होणाऱ्या जत्रोत्सवाची तारीख निश्चित करतात. त्यानुसार यावर्षीचा जत्रोत्सव रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी साजरा करण्याचे गावातील मानकरी, विश्वस्त व ग्रामस्थ यांनी निश्चित केले. यावेळी गावातील मानकरी मोहन पालव, विद्याधर पालव, विश्वनाथ पालव, संतोष पालव, तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आनंद पालव, उपाध्यक्ष महादेव पालव, चिटणीस सदाशिव पालव, खजिनदार सुनिल पालव यांच्यासह विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
बिळवस या गावचा सर्वात मोठा यात्रोत्सव आषाढ महिन्यात असतो. यात्रे दिवशी गावातले चाकरमानी, माहेरवासीणी व देवीचे दूरवर पसरलेले भक्त या यात्रे दरम्यान देवीच्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. यात्रेच्या दिवशी सकाळी देवीला निळ घालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून ही नीळ बनवली जाते. नंतर देवीचा पेटारा वाजत-गाजत मानकरी मंडळींकडून मंदिरात आणला जातो. देवीला वस्त्रालंकार नेसवून, मुखवटा घातला जातो. यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा (दिवा) तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला गावातल्या प्रत्येक घरातून नैवेद्य आणला जातो. मानकरी मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरीतीनुसार गाऱ्हाणी घातल्यावर ओट्या भरण्यास प्रारंभ होतो. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. या जत्रेला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील हजारो भाविक तसेच राजकीय नेते, पुढारी उपस्थित राहतात.
