रूपेश राऊळांचा इशारा: दीपक केसरकर यांचे मतदार संघात दुर्लक्ष तर संजू परबांनी ज्योतिषाचे दुकान घालावे..
⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी तालुक्यातील १५ ते १६ गाव वेंगुर्ला तालुक्यातील महावितरणशी जोडलेली असून यामुळे ग्रामस्थांना सावंतवाडीत येऊन पुन्हा वेंगुर्लेत जावं लागतं आहे. ८-८ दिवस काळोखात राहायची वेळ जनतेवर येत असून याला आमदार दीपक केसरकर जबाबदार आहेत. ८ दिवसांत ही परिस्थिती न बदल्यास मळेवाड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रास्तारोको आंदोलन छेडले असा इशारा विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला. तर माझी कुंडली काढण्यापेक्षा संजू परब यांनी ज्योतिषाच दुकान घालावं असा पलटवार श्री. राऊळ यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. राऊळ म्हणाले, पावसाच्या आगमनाने अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. आज वीजेचा लपंडाव सुरू असून लोकांना काळोखात रहावं लागतं आहे. यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. मात्र, तालुक्यातील १५-१६ गाव वेंगुर्ला तालुक्यातील महावितरणशी जोडलेली आहेत. यामुळे सातार्डा, आरोंदासह अनेक गावाना वेंगुर्ल्यातील महावितरण कार्यालयात जावे लागते. लाईट नसताना ग्रामीण भागातील लोक सावंतवाडीत येऊन पुन्हा वेंगुर्ला तालुक्यात जात आहेत. याचा फटका गोरगरीब लोकांना सहन करावा लागत आहे. यापूर्वी देवासमोर आरती करूनही प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही. निवेदन देऊन, आंदोलन करूनही जाग येत नसल्याने आता आमचा संयम संपला आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच याकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरणार असून आठ दिवसांत ही परिस्थिती न बदल्यास मळेवाड येथे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा श्री. राऊळ यांनी दिला.
तर शहरासह तालुक्यातील जनतेला आज त्रास सहन करावा लागत आहे. विकासकाम मात्र दिसत नाही. सत्ताधाऱ्यांना आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर बोलताना देखील लाज वाटली पाहिजे असा टोला हाणला. तर आम्ही सत्तेत असताना हे हॉस्पिटल वेत्ये गावात होण्यासाठी जमीन देखील देत होतो असंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आरोग्यासाठीच्या केवळ गोष्टी करणाऱ्यांना आता लाजा वाटल्या पाहिजेत अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच माझ्या कुंडल्या काढण्याची भाषा करणा-या जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आता ज्योतिषाचे दुकान घालावे. त्यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. त्यांच्याकडे आडाळीतील माती उत्खननावरून केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यास काहीच मुद्दे नाहीत. उद्योगमंत्री यांच्या पक्षाचे असताना हे साधी कारवाई संबंधितांवर करू शकत नाहीत. त्यामुळे कुंडल्या काढण्याची भाषा संजू परब यांनी करू नये असा पलटवार देखील केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब, अशोक धुरी, सुरेश गावडे, राजू शेटकर, गुरु नाईक आदी उपस्थित होते.
