मत्स्य विभागाने आमचा अंत पाहू नये:पारंपारिक मच्छिमार रश्मीन रोगे यांचा इशारा..
⚡मालवण ता.२५-: यंदाचा मासेमारी हंगाम संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून स्थानिक मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर काढण्यात येत असल्याचा फायदा घेत बेकायदेशीर एलईडी मासेमारी राजरोसपणे किनाऱ्यालगत सुरू आहे. असे असताना अनधिकृत मासेमारी विरोधात कारवाई सुरूच असल्याचा दावा करणाऱ्या मत्स्य व्यवसाय विभागातील अधिकारी, कर्मचारी हे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. किनाऱ्यावरून आम्हाला समुद्रातील एलईडी लाईट मासेमारी नौका दिसत असताना मत्स्य अधिकाऱ्यांना का दिसत नाहीत ? मत्स्यव्यवसाय विभाग आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये ? एलईडी लाईट मासेमावरीवर कारवाईसाठी मत्स्य विभागाला आम्हा मच्छिमारांची मदत हवी असेल तर ती आम्ही जीवाची पर्वा न करता क़रायला तयार आहोत. बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य अधिकाऱ्यांसोबत भर समुद्रात येण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे मालवणातील पारंपारिक मच्छीमार रश्मीन रोगे यांनी सांगितले.
मालवणच्या समुद्रात गेले अनेक दिवस एलईडी मासेमारी राजरोसपणे सुरू असल्याने पारंपारिक मच्छीमारांनी थेट वृत्तपत्रांना फोटो उपलब्ध करून देत आपली व्यथा मांडली. मत्स्यव्यवसाय विभाग फक्त वरिष्ठ अधिकारी आणि मत्स्य मंत्र्यांना खुश करण्यासाठी कारवाईची हमी देत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई सुरू नसल्याने मालवण समुद्रात बिनधास्तपणे एलईडीचा धुमाकुळ राजरोजपणे सुरू आहे, अशी टीका रश्मीन रोगे यांनी केली आहे.
पर्ससीनसाठी अधिकृत परवाने किती दिले आहेत, याची अद्याप माहिती देण्यात येत नाही. त्यांची मासेमारी ही १२ वावाच्या बाहेर केली जाते. परंतु जर या बोटी १२ वावाच्या आतमध्ये मासेमारी करत असतील तर तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकता का? या बोटी ये-जा करतात, त्यांना लँडींग पॉईंट किती आहेत. पर्ससीन मासेमारीला ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये मासेमारी करण्याचा परवाना असतो. परंतु १ जानेवारी ते ३१ मे केंद्र सरकारच्या कालावधीनुसार बॅन पिरीयड असताना राज्य सरकारमार्फत मत्स्य विभागातर्फे काय कारवाई केली जाते ? असा प्रश्न उपस्थित करुन केंद्र सरकारच्या जलधी क्षेत्रामध्ये सांगत नाही तर राज्य सरकारच्या जलधी क्षेत्रामध्ये काय कारवाई करत आहात? राज्य सरकारचे जलधी क्षेत्र साडे बावीस फेंदमपर्यंत राज्य सरकारने बॅन केलेले आहे. आज सव्वा महिने एलईडीच्या बोटी लैंडिंग करून आहेत, असाही आरोप रोगे यांनी केला आहे.
बंदरावर ज्यांना परवाना नाही, अशा बोटींवर जाळी ठेऊन काय करतात. या जाळ्यांमध्ये आपोआप मासे येऊन पडतात का? येथील स्थानिकांच्या बोटीवर कारवाई केली होती. नोटीस लावलेल्या बोटीवरील जाळे उतरवून पलायन केले. त्याचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता नाही. दर महिन्याला येऊन विचारावे लागते की कारवाई का होत नाही ही मोठी खंत आहे, असेही रश्मीन रोगे म्हणाले.
