⚡कणकवली ता.२६-: मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या कडाक्याने हैराण झालेल्या कणकवलीकरांना अखेर दिलासा मिळाला. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोरदार गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा असह्य झाला होता. मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढत ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच गडगडाटासह पावसाची सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला.
दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आंबा व काजू पिकांसाठी हा पाऊस काही प्रमाणात हानिकारक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
