Headlines

गवंडीवाड्यातील जलमय रस्त्याच्या समस्येला अखेर दिलासा

नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या पुढाकाराने पाण्याचा निचरा सुरळीत

मालवण दि (प्रतिनिधी) :

मालवण गवंडीवाडा परिसरातील राजा बटाव ते बाळू चव्हाण यांच्या घरासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, स्थानिक नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या पुढाकाराने आणि मालवण पालिका प्रशासनाच्या तत्पर सहकार्यामुळे ही समस्या अखेर मार्गी लागली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळ्यात या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने परिसराला डबक्याचे स्वरूप प्राप्त होत होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वर्षांपासून कायम असलेल्या या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीची दखल घेत नगरसेविका पाटकर यांनी तातडीने पालिका प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करून घेतली. त्यानंतर युद्धपातळीवर काम हाती घेत रस्त्यावर बारीक खडी टाकण्यात आली. त्यामुळे रस्त्याची पातळी सुधारून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

“गेल्या अनेक वर्षांपासून दर पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणे अत्यंत कठीण झाले होते. नगरसेविका शर्वरी पाटकर यांनी आमची अडचण समजून घेत तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे आता रस्ता सुरक्षित व चालण्या योग्य झाला आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

अनेक वर्षांपासूनची ही समस्या निकाली निघाल्याने गवंडीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जनहिताचे हे काम मार्गी लावल्याबद्दल नगरसेविका शर्वरी पाटकर तसेच मालवण नगर पालिका प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले.

You cannot copy content of this page