⚡वेंगुर्ला ता.०२-: तालुक्यातील आडेली खुटवळवाडी भागातील पाण्याच्या समस्याबाबत येथील शेतकरी अजय अशोक गडेकर यांनी वृत्तपत्रद्वारे शासनाकडे मागणी केली होती. याबाबत वेंगुर्ला पं. स. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी आडेली ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभाग यांच्याशी संपर्क साधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु याबाबत या भागाचे जनतेने विश्वासाने निवडून दिलेले जि. प. सदस्य विजय नाईक व पं. स. सदस्य नितीन मांजरेकर तसेच थेट सरपंच यशस्वी कोंडसकर यांनी संबंधित भागात पाहणी अथवा भेटही न दिल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गायीना – जनावराना दूषित पाणीच प्यावे लागत असून शासनाच्या या भागातील कानाडोळा करण्यामुळे शेतकरी अजय गडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान खुटवळवाडी येथील टाकी बांधण्यात आलेल्या नजिकच्या बोअरवेल, केळूसकरवाडी येथील सार्वजनिक विहिर येथील पाण्याचा साठा कमी असल्यास कुडाळकरवाडी येथील विहीरीवरून पाणीपुरवठा करण्याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ जीवन कुडाळकर यांनी सहमती दर्शवून पंचायत समितीस आवाहन केले आहे. दरम्यान याच भागात असलेल्या बोअरवेल अथवा आडेली खुटवळवाडी ( सोनसुरकरवाडी ) येथील नजिकच्या जुन्या सार्वजनिक विहिरीवरून संबंधित काही ग्रामस्थांना पाणीपुरवठा होऊ शकतो. हे अंतर कमी असल्याने याठिकाणी शासनाने त्वरित पाहणी करून नळपाणी योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आडेली खुटवळवाडी पाणी समस्येकडे लोकप्रतिनिधिचेही दुर्लक्ष…
