शहरात वाढलेल्या भिकाऱ्यांवर निर्बंध आणा, सीसीटीव्ही चालू करा…

चोरीच्या पार्श्वभूमीवर बांदा भाजपा शिष्टमंडळाची मागणी..

⚡बांदा ता.२८-: शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर व वाढलेल्या भिकाऱ्यांच्या प्रमाणावर निर्बंध आणावेत याकरीता बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने बांदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पालवे यांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत निवेदन सादर केले.

यात शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या अज्ञात व्यक्तींमुळे बांदा बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होत असून त्यांना तेथून तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही चालू करण्याची देखील विनंती करण्यात आली. तसेच आवश्यक ठिकाणी नविन सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच सोमवारच्या आठवडा बाजारात पोलीस कर्मचारी तैनात ठेवावेत व शहरातील वाड्यांमध्ये फिरणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणावेत. अशा प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले की, पुलाखाली वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या सोबतीने तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील सीसीटीव्ही संदर्भात जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे मागणी सादर केली आहे. तसेच सोमवार बाजारात पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रीची गस्त देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान कमिटी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर, निलेश नाटेकर, शैलेश केसरकर, सुनिल धामापूरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page