१५ फेब्रुवारीपासून श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचा दिमाखदार सोहळा:प्रशासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्टची तयारी युद्धपातळीवर..
⚡देवगड ता.०४-:
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची वार्षिक यात्रा यंदा १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. यंदा १७ फेब्रुवारी रोजी ‘दर्श अमावस्या’ असल्याने तीर्थस्नानासाठी आणि देव दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड , संजय वासुदेव वाळके, मंगेश पेडणेकर, दीपक घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले, भाविकांच्या सुविधेसाठी चोख नियोजन
यात्रेकरूंच्या सोयीसाठी भव्य मंडप व्यवस्था, अखंडित विद्युत पुरवठा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मजबूत बॅरिकेडिंग आणि रेलिंग बसवण्यात आले आहे. तसेच, भाविकांना दर्जेदार ‘गुळ-बुंदी लाडू’ प्रसाद म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर
सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर
यात्रेत चोऱ्या आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी मंदिर व परिसर परिसरात ‘जम्बो कॅमेऱ्यांसह’ सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात आले आहे. सुरक्षेसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्रकिनारी ‘सागरी सुरक्षा दल’ तैनात असेल. देवगड महाविद्यालयाचे १०० प्रशिक्षित विद्यार्थी स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि शोध-बचाव कार्यासाठी प्रशासनाला मदत करणार आहेत.
रस्त्यांच्या प्रलंबित कामांमुळे भाविकांमध्ये नाराजी
देवगड-मिठमुंबरी-तारामुंबरी पुलामार्गे समुद्रकिनाऱ्यावरून येणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन गेल्यावर्षी देण्यात आले होते. मात्र, हे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, पालकमंत्री महोदयांनी एमटीडीसीच्या जागेत पार्किंगसाठी सपाटीकरण करण्याच्या सूचना देऊनही संबंधित विभागाने अद्याप कार्यवाही केलेली नाही. यामुळे यात्रेत मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध यात्रा
बॅनर बंदी: रस्त्यांवर कमानी व राजकीय बॅनर्स लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्ती
व्यापारी व पूजा साहित्य विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात एलईडी स्क्रीनद्वारे दाखवण्यात येणार आहे.
देवस्वाऱ्यांचे आगमन आणि भाविकांना आवाहन
यंदा यात्रेसाठी ५ देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून, पहिल्या दिवशी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे आगमन होईल. या काळात गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांनी दिवसा दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच, सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. अद्याप संपर्क न केलेल्या देवस्वारी कमिटींनी तातडीने ट्रस्टशी संपर्क साधावा.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
