⚡मालवण ता.०४-:
मालवण तालुक्यातील माळगाव
बागायत परिसरात गेले दोन महिने बीएसएनएल ची नेटवर्क सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या परिसरात इतर कोणतेही नेटवर्क नसल्यामुळे येथील नागरिकांना बीएसएनएल हाच एकमेव पर्याय आहे. परंतु या भागात असलेल्या बीएसएनएल टॉवरचा ग्रामस्थाना कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. बीएसएनएल सेवा वारंवार खंडित होत असल्याने बीएसएनएल ग्राहकांची विविध कामांमध्ये मोठी गैरसोय होत असून अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
सध्या गॅस सिलेंडर बुक करणे, रेशन घेणे तसेच इतर दैनंदिन कामासाठी शासनाने OTP बंधनकारक केला असून त्यासाठी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची नितांत गरज भासते. परंतु बागायत बाजारपेठेत बीएसएनएल नेटवर्कच खंडित होत असल्याने ग्राहकांना तासन तास थांबूनही नेटवर्क अभावी महत्वाची गरज असलेले सिलेंडरही खरेदी करता येत नाहीत. तसेच परिसरातील रिक्षा व्यावसायिक, व्यापारी यांनाही नेटवर्क समस्येचा फटका बसत आहे. याबरोबरच येथून जवळच असलेल्या आंगणेवाडी श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून या यात्रोत्सवासाठी बागायत, माळगाव, खेरवंद, भोगलेवाडी, परिसरातील अनेक मुंबईकर गावी येतात. त्यांनाही या नेटवर्क समस्येचा फटका बसणार आहे. त्यामुळे बीएसएनएल विभागाने व अधिकाऱ्यांनी तातडीने बागायत परिसरातील नेटवर्क समस्येची दखल घेऊन तातडीने ही समस्या सोडवावी अशी मागणी माळगाव, बागायत परिसरातील बीएसएनएल ग्राहकांनी केली आहे.
