⚡दोडामार्ग ता.०९-: तालुका हत्तीमुक्त करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले असतानाही हत्तींचा उपद्रव सुरूच आहे. वन विभागाने जंगली हत्तींचा कळप जंगलातच रोखण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिवसा काही प्रमाणात नियंत्रण असले तरी रात्रीच्या वेळी हे प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी हत्तींच्या कळपाने बाबर्डे गावात प्रवेश करून शेती व बागायतींचे मोठे नुकसान केले.
काल रात्री बाबर्डे येथील तुकाराम गावडे यांच्या शेतीत ‘बाहुबली’ हत्तीने धुडगूस घातला. चार–पाच वर्षांच्या मेहनतीने वाढवलेली नारळ, सुपारी, केळी व अननसाची पिके एका रात्रीत उद्ध्वस्त झाली. संपूर्ण शेत नासधूस झाल्याने शेतकरी कुटुंब मानसिकदृष्ट्या कोलमडले आहे.
अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप आहे. शेतकऱ्यांचा संयम तुटण्याच्या मार्गावर असून तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी माहिती शेतकरी दत्ताराम देसाई यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यात हत्ती उपद्रव वाढला; बाबर्डेतील शेती बागायतींची नासधूस…
