सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी मुंबईत भव्य उपोषण आंदोलन…

६७ वर्षीय कोकणी आजोबांचे आमरण उपोषण; चाकरमान्यांच्या हक्कासाठी लढा तीव्र..

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावा, तसेच कोकणी चाकरमान्यांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर व्हावी, या मागणीसाठी मुंबईत भव्य उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. मुंबईस्थित महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ यांच्या वतीने कोकण रेल्वे महामंडळाला उपोषणाची अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ६७ वर्षीय मुंबईकर चाकरमानी कोकणी आजोबा हे सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. ज्या वयात निवांत आयुष्य जगायचे, नातवंडांबरोबर वेळ घालवायचा, त्या वयात केवळ कोकणातील पोराबाळांचा आणि मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या नि:स्वार्थ भावनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
सावंतवाडी येथे ‘परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व कोचिंग डेपो’ उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता आता ठोस कृती व्हावी, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. टर्मिनस पूर्ण न झाल्यामुळे चाकरमान्यांना प्रवासात होणाऱ्या अडचणी, वेळेचा अपव्यय आणि गैरसोयी आजही कायम आहेत.
या पार्श्वभूमीवर तमाम कोकणवासी, तरुणाई आणि चाकरमान्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा उभारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या:
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करावे.
सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.
मुंबईकर व कोकणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करावा.
२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे महामंडळ, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आंदोलन होणार आहे.

या आंदोलनामुळे कोकण रेल्वे महामंडळ आणि केंद्र सरकारचे लक्ष सावंतवाडी टर्मिनसच्या प्रलंबित प्रश्नाकडे वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“हा लढा माझ्यासाठी नाही, माझ्या कोकणातील पोराबाळांच्या सुखकर प्रवासासाठी आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया उपोषणकर्त्या आजोबांनी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page