⚡मालवण ता.०६-:
मालवण मधील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या रौप्यपर्व पूर्ती सोहळा वर्षानिमित्त ‘आगीनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या सहकार्याने तसेच ऐलमा पैलमा अक्षर देवा, सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने रविवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथील दादासाहेब शिखरे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी साने गुरुजी वाचन मंदिरच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर, सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, खजिनदार शैलेश खंडाळेकर, साहित्यिक सुयोग पंडित, व्यवस्थापक संजय आचरेकर, ग्रंथपाल ऋतुजा केळकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. एखाद्या वास्तू अथवा वस्तूचे रौप्य महोत्सव साजरे होत असतात, परंतु एखाद्या पुस्तकाचा रौप्य महोत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वैशाली पंडीत यांचा आगीनझाड हा कथासंग्रह आजच्या परिस्थितीशीही जोडला जाणारा असल्याने तो आजही तेवढाच वाचनीय आहे. त्यामुळे हा कथा संग्रह आजच्या मुलांसमोर व नवीन वाचकांसमोर यावा हा यामागे उद्देश असून या माध्यमातून कथालेखनासाठी देखील मुलांना व नवसाहित्यिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे यावेळी डॉ. तोरसकर यांनी सांगितले.
यावेळी वैशाली पंडित म्हणाल्या, आगीनगाडी या कथा संग्रहाच्या माध्यमातून मी प्रथमच कथालेखनास सुरुवात केली होती. या कथासंग्रहाचे महाराष्ट्रभरातून कौतुक होऊन अनेक मान्यवरांचे चांगले अभिप्रायही मिळाले होते. आपल्या हयातीत या पुस्तकाचा रौप्य महोत्सव साजरा होत असल्याने आपणास विलक्षण आनंद होत आहे, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांच्या हस्ते होणार असून, कथा अभिवाचन ॲड. अपर्णा परांजपे प्रभु करणार आहेत. ‘आगीनझाडचे मराठी साहित्यामधील योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्यात सुप्रसिद्ध अनुवादक वंदना करंबेळकर, कवयित्री ॲड. अपर्णा परांजपे प्रभु, नाट्य व चित्रपट अभिनेते अभय खडपकर व कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात साहित्यिक वैशाली पंडित यांची विशेष मुलाखत डॉ. ज्योती तोरस्कर घेणार आहेत. कार्यक्रमाच्या समारंभ अध्यक्षपदी नमिता कीर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देत या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. तोरसकर व लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी यावेळी केले.
