सत्ताधाऱ्यांना जमत नसेल तर भाजप तयार;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.१५-:* सत्ताधाऱ्याना जमत नसेल तर जिल्ह्यातील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची जबाबदारी घेण्यासाठी भाजप तयार आहे. सत्ताधाऱ्यांनी निदान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी झूम ऍप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. पालकमंत्री आणि आमदार यांना सरकार मध्ये कोणीच विचारत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी कोल्हापूर प्रमाणे सिंधुदुर्गात देखील टास्क फोर्स निर्माण करावी अशी मागणी आपण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली असून, पत्रकार परिषद घेऊन नुसत्या घोषणा न करता काम करावे, असा टोला लगावला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर सुरू करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. पण प्रत्यक्षात तेथील व्हेंटिलेटर सुरू नसल्याचे त्यानी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
