वायंगणी स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष सदानंद उर्फ सदा राणे यांचे निधन…!

⚡मालवण ता.१३-:
वायंगणी येथील स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष स्वामी भक्त सदानंद यशवंत राणे ( वय 63 ) यांचे शनिवारी सकाळी वायंगणी येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले.
ते स्वामी भक्त म्हणून प्रचलित होते. २०१७ सालपासून त्यांनी ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्षपद सांभाळत वायंगणी हायस्कूलच्या उत्कर्षासाठी ते नेहमी तत्पर होते. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यासाठी त्यांनी आपली जागा ही विनामोबदला दिली होती. स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असे.

नेहमी सहकार्यास तत्पर असलेले, स्वामींच्या भक्तीत रमलेले समाजसेवक सदानंद राणे हे गेले काही दिवस आजाराने त्रस्त होते. शनिवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,भाऊ भावजय सुन नातवंड असा परीवार आहे. वायंगणी येथील सुप्रसिद्ध मुर्तिकार सागर राणे यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page