ज्ञानाबरोबर रूजलेले संस्कार भविष्यात आत्मिक समाधान देईल-:विलास हरमलकर…

⚡वेंगुर्ला ता.३०-: ग्रामीण भागातील शाळेची दहावी परीक्षा १०० टक्के निकालाची परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळविलेल्या ज्ञानाबरोबरच रूजलेले संस्कार, सद्भावना, नितीमूल्ये भविष्यात यशाबरोबरच खरेखुरे आत्मिक समाधान देईल असे उद्गार

उद्योजक विलास हरमलकर यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी काढले.

 अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने अणसूरपाल हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच हायस्कूलच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे, प्रमुख पाहुणे उद्योजक विलास हरमलकर (गोवा), शालेय समिती सदस्य दिपक गावडे, नाना गावडे, राजन गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, बिट्टू गावडे, वासुदेव बर्वे, अनंत मांजरेकर, प्रभाकर गावडे, दिपक गावडे, सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

  दहावी परीक्षेत हायस्कूलमधून प्रथम तीन क्रमांकांत उत्तीर्ण झालेल्या साहिल गावडे, धनश्री गावडे, लक्ष्मी तेंडोलकर या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट फोल्डर व पेनसेट तर चतुर्थ क्रमांक साहिल गावडे व तनिष्का राऊळ तसेच पाचवा क्रमांक प्राप्त धनश्री केरकर यांच्यासह इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेनसेटदेऊन गौरविण्यात आले. संस्थेच्यावतीने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचाही गौरव करण्यात आला. संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जीवन विद्या मिशन पुस्तिका भेट दिली. शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी विलास हरमलकर यांनी आर्थिक निधी देण्याचे तर इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेंगुर्ला रोटरीचे अध्यक्ष आनंद बोवलेकर यांनी स्पोर्ट्स टीशर्ट देण्याचे जाहीर केले. सरपंच सत्यविजय गावडे यांनी सरपंच मानधनाची रक्कम शैक्षणिक विकास कार्यासाठी संस्थेस देण्याचे  जाहीर केले. पाल गावचे माजी सरपंच वासुदेव बर्वे यांनीही विद्यार्थी व शिक्षक परिवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शाळा व संस्थेच्यावतीने विलास हरमलकर आणि रोटरी अध्यक्ष आनंद बोवलेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  

  संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून भावी जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. सेक्रेटरी लिलाधर गावडे यांनी दिलेल्या संदेशात विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून, शैक्षणिक विकासासाठी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांत सर्व माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या भरीव सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

   प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी, सुत्रसंचालन विजय ठाकर, गुणगौरव अहवाल वाचन अक्षता पेडणेकर व आभार संचिता परब यांनी मानले.

फोटोओळी – अणसूर पाल हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page