आंबोली,ता.२४: देशात तिसऱ्या आणि राज्यात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोली चा पाऊस मोजण्याच्या प्रक्रियेचेच तीन तेरा वाजवले आहेत. याकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. आंबोली मध्ये ब्रिटिश काळापासून पाऊस मोजला जातो. पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजण्याचे काम अनेक वर्षे अगदीच तुटपुंज्या नाम मात्र मानधनात येथील भाऊ ओगले करीत होते. शासकीय विश्राम गृहाजवळ पाऊस मोजण्यासाठी ची १० गुंठे जागा शासनाच्या नावे आहे. मात्र एका लोकप्रतिनिधीच्या हॉटेल ला अडथळा होत असल्याने वर्षानुवर्षे तेथे पाऊस मोजण्याची जागा तेथून ते यंत्र हटवण्यात आले. गेल्या वर्षी ते यंत्र ग्रामपंचायत जवळील तेथील इमारतीच्या छतावर बसवण्यात आले. हे यंत्र सौर ऊर्जेवर चालणारे असून त्याची माहिती थेट खारेपाटण येथील पाटबंधारे कार्यालयाला मिळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आंबोली मध्ये जास्त पाऊस आणि धुके असते. आंबोलीत मोठे मोठे सोलर आणि बॅटरी देखील अनेकांनी लावल्या त्या चालत नाहीत तर एवढ्याशा यंत्रातील सौर ऊर्जा आठ आठ दिवस सतत पावसात कशी काय चालू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाईट देखील ४-५ दिवस गायब असते. अशा परिस्थितीमधे बाहेरचे अधिकारी या ठिकाणी अजब दावा करीत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाची मोजणी झाली नाही. काहीतरी बनावटगिरि अधिकारी करीत आहेत. स्थानिक व्यक्ती करवी पाऊस मोजणी हेच योग्य आहे. जर जागा उपलब्द नसेल तर महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयाजवळ हे यंत्र बसवता येऊ शकते. आंबोलीचा पाऊस अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात पावसाची विचारणा पण करतात. पर्यटका ना तो उत्सुकतेचा विषय असतो.येथील शेती तसेच पावसाळ्यातील नियोजन असण्यासाठी पाऊस समजण्याची आवश्यकता असते. मात्र पाट बंधारे कार्यालयातील अधिकारी पावसाची माहिती उघड करू नका असे फतवे काढत असतात. अधिकाऱ्यांचा इगो पुढे येतो त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत आंबोली च्या पावसाचे महत्व कमी करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. महाबळेश्वर येथील च पाऊस सर्वाधिक जास्त होतो हे दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. सौर ऊर्जेवर आंबोली मधील अनेकांची लाईट आहेत.शासनाच्या देखील सौर लाईट लावल्या आहेत त्यादेखील पावसात चालत नसताना अधिकाऱ्यांनी येथे दावा करून पाऊस मोजण्याच्या प्रक्रियेला हरताळ फासला आहे.त्यामुळे ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्या नंतर ही इतक्या वर्षात गेल्या वर्षी च फक्त पावसाचे मोजमाप झाले नाही.त्याबाबत कुठलीही सत्य माहिती मिळाली नाही.१ जुन ते ३१ ऑक्टोबर पर्यंत आंबोली चा पाऊस मोजला जातो. त्यामुळे यामधे पालक मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
राज्यातील सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोलीत पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजणी करण्याची मागणी: अनिल चव्हाण…
