जात निहाय जन गणना या निर्णयाबाबत मोदी सरकारचे अभिनंदन…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

⚡ओरोस ता २-:
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातीनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये काॅग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली नाही, असा आरोप केला आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई आणि कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,रुपेश कानडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, मोदी सरकारने शास्त्रीय पद्धतीने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची मोदी सरकारची भूमिका आहे. याच पद्धतीने मोदी सरकारने 2019 मध्ये आर्थिक मागासले पण लक्षात घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनता पार्टीने आजवर जात निहाय जनगणनेला कधीच विरोध केला नाही. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जात निहाय जनगणनेला भाजपाचा पाठिंबा आहे हे अनेकदा स्पष्ट केले आहे. जनगणने बरोबरच जात निहाय गणना व्हावी अशी भाजपाची भूमिका आहे. २०२१ मध्ये सार्वत्रिक जनगणना कोरोना मुळे होऊ शकली नव्हती. आता जन गणना होईल त्याच्या बरोबरच जात निहाय गणना होणार आहे. बिहार मध्ये जात निहाय पाहणी करण्यास भाजपाने पाठिंबा दिला होता . राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यात कधीच अशी पाहणी केली नाही. १९५१ ते २०११ या काळात जेवढ्या जन गणना झाल्या त्यात अनुसूचित जाती जमातींची आकडेवारी दिली गेली. मात्र ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही. आता मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग भाजपा कडून सर्व तालुका स्तरावर जल्लोष करण्यात येत आहे, असे सावंत यांनी सांगितले.

फोटो:- प्रभाकर सावंत

You cannot copy content of this page