मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी:चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार..?
कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांची गेल्या तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांना चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार ? असा सवाल देखील श्री. किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.
कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या जमान्यात गेले तीन वर्ष सुरू असलेली चौकशी नेमकी कधी संपणार, कधी कारवाई होणार की चौकशी आडून केवळ दबाव तंत्र वापर करुन हे सत्ताधारी पक्षात गेले की क्लिनचीट देणार?
बरं लाच लुचपत विभाग एवढेच कार्यतत्पर असेल तर तत्कालीन पालकमंत्री विद्यमान आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिनांक 28/9 /2024 रोजी दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीमध्ये जिल्हा परिषदेच्या बड्या अधिकाऱ्याने प्रति महिना दहा कोटीची लाच ऑफर दिल्याचे जाहीरपणे सांगितले होते. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत आम्ही 30 सप्टेंबर 2024 रोजी लाचलुचपत विभागास या विषयाची सखोल चौकशी करून कारवाई करण्या संदर्भातील निवेदनही दिले होते. लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा असताना सदर निवेदन देऊन आज पाच सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत गेली तीन वर्षे विरोधी पक्षातील अनेकांची तत्परतेने चौकशी करणाऱ्या लाचलुचपत विभागाने अद्याप पर्यंत काहीच कारवाई केलेली दिसत नाही.
त्यामुळे एसीबीची कारवाई ही केवळ सत्ताधारी पक्षासाठी विरोधकांवर दबावाच राजकारण करण्यासाठी करत असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.
