समीर नाईक यांनी दाखवली तत्परता : वीज तारांना लागणारी झुडपे तोडण्याची मागणी
*💫बांदा दि.२०-:* भर दुपारच्यावेळी पाडलोस केणीवाडा येथे माडाचे झावळ विद्युत वाहिनीवर पडल्यामुळे दोन्ही वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श झाला व ठिणगी पडून आग लागण्याची घटना घडली. परंतु युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पावसाळा तोंडावर आल्याने वीजवाहिन्यांना घर्षण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी वारंवार वीज प्रशासनाकडे केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात वीज गुल होण्याचे प्रमाण मोठे आहे, त्याच पार्श्वभूमीवर वीज वितरणने स्वतः पुढाकार घेऊन विद्युत वाहिन्यांना लागणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्या व वाहिन्या निर्धोक करण्याची मागणी समीर नाईक यांनी केली आहे. वीज बील वेळेवर भरणा करा असे आवाहन वीज वितरणकडून वारंवार करण्यात येते. मात्र वाहिन्या निर्धोक करण्याकडे दुर्लक्ष का होते असा सवाल समीर नाईक यांनी केला आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या न तोडल्यास वीज वितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही श्री. नाईक यांनी दिला आहे.
