⚡सावंतवाडी ता.२०-: विनापरवाना वृक्षतोड ५० हजार दंडाच्या शासन निर्णयाविरोधासह या शासन निर्णयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला वगळण्यासाठी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयावर सोमवारी २१ ऑक्टोंबर रोजी श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात येणारा भव्य मोर्चा सध्या आचारसंहितेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश जारी केल्यामुळे आणि प्रशासनाच्या विनंतीनुसार हा मोर्चा स्थगित केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी दिली आहे.
शासनाच्या एका झाडाला ५० हजार रुपयाच्या अन्यायकारक निर्णयांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व लाकुड व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहेत. त्यामुळे या वृक्षतोड दंड निर्णय विरोधात जिल्ह्यातील लाकूड व्यावसायिक आणि शेतकरी संघटित झाले. शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष बाब म्हणून विचार करुन या वृक्षतोड दंड निर्णयाचा फेरविचार करावा अशी लाकूड व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. या निर्णयाविरोधात
शेतक-यांचा उद्रेक काय आहे हे शासनाला दाखविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता.
मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मोर्चा, उपोषणे आदीबाबत जमाबंदी आदेश जारी केल्यामुळे आणि प्रशासनाच्या विनंतीनुसार हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र या आठवड्यात प्रशासनाची परवानगी घेऊन सावंतवाडी शहरात गांधी चौक किंवा शिवरामराजे भोसले पुतळ्याकडे लाकूड व्यावसायिक व शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील लाकूड व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी केले आहे.
