⚡सावंतवाडी ता.१६-: तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा जमाबंदीचा आदेश असताना देखील बांदा कट्टा कॉर्नर येथे मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयीतांची आज सावंतवाडी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी सरपंच मंदार कल्याणकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, माजी सभापती प्रमोद कामत, माजी सरपंच अक्रम खान, उपसरपंच जावेद खतीब, माजी उपसभापती शितल राऊळ , उमेश पेडणेकर ‘ विकास केरकर , मधुकर देसाई , प्रवीण देसाई यांसह २५ ते ३० जणांविरोधात मनाई आदेशाचे भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऐकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. परंतु साक्षीदार यांच्या जबानीतील विसंगती व तपासकामातील कार्यप्रणाली मधील त्रुटी व औपचारिकता तसेच गुन्हा शाबीत करण्यासाठी सरकारी पक्षाची असमर्थता आदी मुद्दे आरोपिचे वकील ॲड. परिमल नाईक यांनी मांडले व सदर मुद्दे ग्राह्य मानून सर्व आरोपिंची निर्दोष मुक्तता न्यायाधिश श्रीमती आर. जि. कुंभार यांनी केली.
संशयितांच्यावतीने ॲड. परिमल नाईक यांच्यासह ॲड. सुशील राजगे, ॲड. रश्मी नाईक, ॲड फराहन राजगुरू, ॲड. अमिषा बांदेकर यांनी काम पाहिले.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मनाई आदेशाचे उल्लंघन प्रकरणी संशयितांची निर्दोष मुक्तता…
