शितल शेठ देवरुखकर:
ज्या माणसाने स्वार्थासाठी निष्ठा विकली तो आपल्या पदाकडे तरी निष्ठेने कसा पाहणार..
⚡सावंतवाडी ता.०७-: कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथली माणसे निष्ठावंत आहे. मात्र या बालेकिल्ल्याला काही गद्दारांनी गालबोट लावले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडी शक्तीने अशा गद्दारांना गाडून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन ठाकरे सेनेच्या उपनेत्या तथा नवनिर्वाचित सिनेट सदस्य सौ शितल शेठ देवरुखकर यांनी केले.
तर उभ्या महाराष्ट्रात आज महिला तसेच चिमुरडींवर अत्याचार होत आहेत रोज सकाळी अशा नवनवीन गोष्टी कानावर येत आहेत त्यामुळे लाडकी बहीण म्हणून हातावर पंधराशे रुपये टेकणारे सरकार आता आम्हाला नको आहे तर लाडक्या बहिणी सुरक्षित राहतील असे सरकार आम्हाला पाहीजे यासाठी महिलांनी जागृत व्हावे असेही सौ. देवरुखकर म्हणाल्या.
येथील ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून बॅरिस्टर सभागृहात खेळ फुगडी चा या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सौ देवरुखकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर महिला आघाडी जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी,सावंतवाडी विधानसभा प्रमुख सुकन्या नरसुले जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत, अतुल रावराणे, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा, महिला तालुका संघटक
श्रुतिका दळवी,रश्मी माळवदे, ॲड.निता गावडे,भारती कासार,
समिरा शेख, उपजिल्हा संघटक विनिता घाडी, मारिया डिमेलो,रमेश गावकर, संदीप गवस, संदीप माळकर,सुनिल गावडे,शिवदत्त घोगळे,आबा सावंत,अशोक परब, उल्हास परब, विश्राम कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. देवरुखकर म्हणाल्या, ज्या माणसाला शिवसेनेने स्वीकारून त्यांना मानसन्मान मंत्रीपद दिले अशाने शिवसेनेची गद्दारी करून आपले निष्ठा विकली आज महाराष्ट्राचे महत्वाचे शिक्षण खाते ते सांभाळत आहेत परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारच पाहायला मिळत आहे ज्या माणसाने स्वार्थासाठी निष्ठा विकली तो आपल्या पदाकडे तरी निष्ठेने कसा पाहणार त्यामुळे ज्यांनी कोकणच्या मातीशी कोकणच्या इनामदारीशी निष्ठेची गद्दारी केली अशा गद्दाराला येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाडून जागा दाखवून द्या. आज महिलांनी ठरवलं तर महिला कुठल्या क्षेत्रात काहीही करू शकतात इतकी शक्ती त्यांच्याजवळ आहे आज महाराष्ट्राचा विचार करता अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे त्यामुळे लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देऊन हातावर टेकवत आहेत मात्र या पंधराशे रुपयांपेक्षा लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवणारे सरकार येण्यासाठी आता जागृत होऊन कामाला लागा. फुगडी स्पर्धेच्या माध्यमातून विधानसभा प्रमुख रुपेश राऊ यांनी महिला आघाडीसाठी उचललेले पाऊलही कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
महिला जिल्हाप्रमुख सौ. सावंत म्हणाल्या, सेनेच्या महिला चूल आणि मूळ सांभाळून महिला आघाडी सक्षमपणे सांभाळत आहेत या ठिकाणी 50 खोके घेऊन ज्यावेळी गद्दार पळाले त्यावेळी महिला संघटना संपल्याची वल्गना काहीजण करत होते परंतु आमची संघटना कधीच हलणार नाही. तितक्याच ताकदिने पूर्वीपेक्षा आज महिला संघटना उभी आहे यापेक्षाही उभी राहणार.
जिल्हाप्रमुख धुरी म्हणाले, पोळीसारख्या पारंपारिक लोककलेतून समाजप्रबोधनाचे धडे या ठिकाणी गिरवले जात आहेत याच उद्देशाने आज ठाकरे सेनेकडून या पुढील स्पर्धेचे आयोजन खास महिलांसाठी करण्यात आले आहे. कला जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने राजाश्रयाची गरज असते मात्र राजाश्रय मिळत नाही मात्र या ठिकाणी आयोजित केलेला हा कार्यक्रम पाचशे रुपये आणि दीड हजारासाठी नाही तर फक्त आणि फक्त कला जिवंत ठेवण्यासाठी आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सावंतवाडी विधानसभा प्रमुख सुकन्या नरसुले यांनी केले या स्पर्धेत एकूण 17 फुगडी संघाने सहभाग दर्शवला होता पारंपारिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीच्या फुगड्याचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले या स्पर्धेचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले तर परीक्षण सुहास वरुणकर यांनी केले.
