Headlines

पाण्याच्या टाकीची ३ गुंठे जमीन विनामोबदला हस्तांतर करण्यास तयार…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीबाबत जामीन मालकांचा खुलासा :न.प. ने जमीन मोजणी आणि तुकडा पाडण्यासाठी दिला ना हरकत..

⚡कुडाळ ता.१०-: हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच आम्हाला नगरपंचायतीने जमीन मोजणी व तुकडा पाडण्यासाठी ना हरकत दिला आहे, असे जमीन मालक महादेव तुकाराम आरेकर यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात महादेव तुकाराम आरेकर म्हणतात, स्थानिक नगरसेविका सौ संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदू कॉलनी मधील मोकळ्या जागा रस्ते याबाबत नगरपंचायत प्रशासनावर आरोप केले आहेत. त्या संदर्भात जमीन मालक म्हणून आमची बाजू मांडण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही या ठिकाणी गेली अनेक वर्ष राहत आहोत. हिंदू कॉलनी मध्ये असलेल्या 37 गुंठे जमिनीवर कुळ म्हणून दावा केला होता आणि हा दावा माननीय आयुक्त महसूल यांनी यांनी मान्य करून 2008 मध्ये 37 गुंठ्याचा फेरफार रद्द करून आमच्या नावे केला. हा दावा आम्ही मा. तहसीलदार, मा प्रांताधिकारी, मा. महसूल न्यायाधिकरण मुंबई यांच्याकडे तब्बल 16 दावे दाखल केल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला आणि 37 गुंठे जमीन आमच्या कब्जा मध्ये आले. नगरपंचायतीने त्यानंतर मा. दिवाणी न्यायालय, मा जिल्हा दिवाणी न्यायालय, मा उच्च न्यायालय या स्तरावर सुद्धा दावे दाखल केले. हे सर्व दावे आमच्या बाजूने झाले. ग्रामपंचायत असताना दावा दाखल केला होता. त्यावेळी सुद्धा तो आमच्या बाजूने झाला. या दाव्यामध्ये मा. आयुक्तांनी पाण्याची उभारलेली टाकी पाडण्यासंदर्भात मा न्यायालयामध्ये जा असेही लेखी आदेश दिले होते. मात्र आम्ही मा. न्यायालयात त्या संदर्भात गेलो नाही. या ठिकाणची एक एकर चार गुंठे जमीन हे अजूनही मूळ मालकांच्या नावे आहे. त्या ठिकाणी कुळ म्हणून कोणी नाही. फक्त 37 गुंठे जमीन ही आमच्या नावे झाली आहे आणि त्यामध्ये नगरपंचायतीची उभारलेली पाण्याची टाकी आहे.
आता सन्माननीय नगरसेविका संध्या तेरसे सांगितले की, १ एकर ४ गुंठ्यावर अजूनही मालक आहेत. पण ही जागा रस्ते खुला क्षेत्र म्हणून सोडण्यात आली आहे. जर अजूनही मूळ मालकांच्या नावे या जागा असतील तर गेल्या दहा वर्षांमध्ये नगरसेविका म्हणून त्यांनी या रस्त्यावर शासकीय निधी कसा खर्च केला ? श्री साईबाबा यांचे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते सुद्धा खुला क्षेत्र आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या संस्थेमार्फत खर्च केलेला निधी कसा काय योग्य आहे ? तसेच अजून एका खुल्या क्षेत्रांमध्ये ओपन जिम व गार्डन विकसित करण्यात आले आहे, हे कोणत्या नियमाखाली खर्च करण्यात आले आहे ते सुद्धा त्यांनी सांगावे. जर मूळ मालकांच्या नावे या सगळ्या जागा असतील तर शासनाने म्हणजेच नगरपंचायतीने खर्च कसा केला ? त्यावेळी नगरसेविका म्हणून तुम्ही हरकत का नोंदवली नाही ? नगरसेविका म्हणून या जागा नगरपंचायतीच्या नावे होण्यासाठी कशासाठी प्रयत्न केले नाहीत ? आता 37 गुंठे पैकी 23 गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत म्हणूनच आम्हाला नगरपंचायतीने जमीन मोजणी व तुकडा पाडण्यासाठी ना हरकत दिला आहे, असे या पत्रकात महादेव आरेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page