कुडाळ : नामांकित वकील ऍड. संग्राम देसाई यांची अलीकडेच महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या साठ वर्षाच्या इतिहासात कोकणाला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यासाठी ऍड. संग्राम देसाई यांचा सर्वपक्षीय, सर्व संघटना आणि नागरिक यांच्या तर्फे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. येत्या ६ ऑक्टबरला सायंकाळी ४ वाजता कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये या भव्य सत्कार सोहळा होणार आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्याला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत अमित सामंत, ऍड. बंड्या मांडकुलकर, ऍड. अजित भणगे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रोटेरियन गजानन कांदळगावकर यांच्यासह उपथित मान्यवरांनी याबाबत माहिती देतानाच सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहंन केले आहे.
या पत्रकार परिषदेला अमित सामंत, ऍड. अजित भणगे, ऍड. अमोल सामंत, श्रीनिवास नाईक, विशाल देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, गजानन कांदळगावकर, संतोष शिरसाट, ऍड. आनंद गवंडे, ऍड. स्वरूप.पै आदी उपस्थित होते.
अमित सामंत यांनी प्रस्तावनेतून ऍड. संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार कशासाठी करण्यात येत आहे याविषयी माहिती दिली. त्यांनतर सिंधुदुर्ग बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर म्हणले कि, या नागरी सत्काराला खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे तसेच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे जयंत जयभावे, उपाध्यक्ष सुदीप पासबोला, गजानन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जेष्ठ वकील अजित भणगे यांनी सांगितले की, ही संघटना स्थापन झाल्यापासून या जिल्ह्याला असा बहुमान मिळाला नव्हता. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे मिळून ८०० सदस्य आहेत आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या सदस्यांची संख्या २५ असून त्यामधून अध्यक्ष निवडला जातो. ज्यामध्ये कोकणचे वकील नाहीत. तरीसुद्धा ऍड. संग्राम देसाई हे अध्यक्षपदी निवडून आले ते केवळ त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे असे त्यांनी सांगून पहिल्यांदाच वेल्फेअरसाठी मुंबई येथे त्यांनी जागा मिळवून दिली आहे. वकिलांसाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. आम्ही कधी वकिलांसाठी कार्यक्रम पाहिले नाहीत. पण त्यांनी त्यांच्या कालावधीत हे कार्यक्रम घडवून आणले. १९६१ नांतर एकदाही क्लेषचे कार्यक्रम झाले नव्हते पण गेल्या काही वर्षात ऍड संग्राम देसाई यांनी अनेक कार्यक्रम जिल्ह्यातील वकिलांसाठी केले. असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी संग्राम देसाई यांनी प्रयत्न केले सर्व सामान्यांसाठी आणि वकिलांसाठी नेहमी धडपडणाऱ्या अशा आसामींचा सत्कार होणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्ष रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागातून या पदापर्यंत कोणीही गेलं नव्हतं ते या पदापर्यंत पोहोचले आहेत असे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. फार कमी वयात ऍड संग्राम देसाई यांनी हे यश प्राप्त यश प्राप्त केले आहे गेली २८ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून नागरी सत्कार होणे गरजेचे आहे असे ऍड अमोल सामंत यांनी सांगितले. आमच्या सोबत वावरणारा आमचा मित्र बार कौन्सिलचा अध्यक्ष झाला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे गजानन कांदळगावकर म्हणाले.
बार कौन्सिल अध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांचा ६ ऑक्टोबरला भव्य नागरी सत्कार…
