नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले:
नळपाणी योजनेचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ आणि गुणवत्ता तपासणीनंतरच पुढील कार्यवाही..
⚡सावंतवाडी ता.१०-: येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापारी वर्गाचे 2020 पासून भाड घेतलं जात नव्हते. सहा वर्ष भाड घेतलं नसून प्रशासकीय राजवटीत ही वसूली होत नव्हती. गेले सहा महीने यावर आम्ही लक्ष देत भाडे कमी करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटलो असून सकारात्मक तोडगा काढला आहे. याबाबतचा ठराव देखील सर्वानुमते मंजूर झाला आहे. तसेच संजू परब यांनी दिलेल्या पुराव्यानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तसेच त्या म्हणाल्या, सनातन संस्थेला कमी रकमेत बॅ. नाथ पै सभागृह द्यायच ठरलं होतं. मात्र, त्यांना हे विनामूल्य देण्याच ठरल आहे. संजू परब यांनी याबाबत सुचना मांडल्यावर सभागृहाने एकमतानं हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील काही विकासकामांना मुदतवाढ देण्याच ठरल आहे. लवकरात लवकर काम करून घेण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. नळपाणी योजनेला मुदतवाढ न देण्याच ठरल आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह नुकतीच याबाबत बैठक झाली. जिल्हाधिकाऱ्यांना यावर गुणवत्ता तपासणीचे निर्देश दिले आहेत. लवकरच त्या याबाबतची पाहणी करणार असून जिल्हाधिकारी यांच्या पाहणीनंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पीएमसी, ठेकेदार, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक घेऊन चर्चा होणार आहे. ही योजना ‘थर्ड पार्टी ऑडिट’ साठीही पाठवल जाणार आहे. याचे ५० टक्के काम झालं असून चौकशी नंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. २० कोटीच बील अदा केल असून पाणी पुरवठा योजना दर्जेदार करण्याचा आमच प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, संजू परब यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी केली जाईल. बील काढण्यापूर्वी प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेऊ तसेच आमच लक्ष कामावर आहे. तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास द्यायचं की नाही हा नगराध्यक्षांचा अधिकार आहे अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी सभापती आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे आदी उपस्थित होते.
