तर कोकणातील शिंदे शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा पराभव अटळ…

भाजप नेते अतुल काळसेकर यांचा इशारा:रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला दिले उत्तर

सिंधुदुर्गनगरी ता 19
महायुतीतील शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अनेक दुशने देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वक्तव्याबाबत रामदास कदम यांचा निषेध करतो, तर त्यांनी अशाच पद्धतीने भाजप नेत्यांवर टीका करून चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम केले तर त्यांच्या मुलांसह शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा पराभव अटळ आहे .असा इशारा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी दापोली येथे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करताना मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा रवींद्र चव्हाण यांच्या मुळे झाली आहे,केवळ महामार्गावर फिरून चमकुगिरी करत आहेत, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा .अशी टीका केली होती. याबाबत आज भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांचा निषेध केला. तसेच रामदास कदम हे महायुतीतील नेते असताना भाजपच्या नेत्यांवर कडाडून टीका करीत आहेत. यामुळे सर्वांमध्येच तीव्र नाराजी आहे .त्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून चांगले काम होत असताना आणि विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असताना त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची अनेक वेळा पाहणी करून कामाला गती दिली आहे. ब्रिजची कामे करताना काही मर्यादा येत आहेत, ती घाई गडबडीत करता येत नाहीत, हे माहीत असताना रामदास कदम हे जाणीवपूर्वक भाजप नेत्यांची बदनामी करीत आहेत. नाहक टीका करीत आहेत. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकून तिढा निर्माण करीत आहेत. यामुळे सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशीच स्थिती राहिली तर भाजप कार्यकर्ते कधीही त्यांना माफ करणार नाहीत.आम्हीही त्यांच्या आव्हानाला जशास तसे उत्तर देऊन प्रति आव्हान देऊ शकतो. रामदास कदम बेताल वक्तव्य करून सर्वांनाच दुखावत असल्याने त्यांच्या मुलाचा पराभव अटळ आहे. त्यांनी आपली राजकीय ताकद ओळखावी. त्यांच्या वागण्यात बदल न झाल्यास त्यांच्या मुलासह शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही हे त्यांनी ओळखावे. त्यासाठी रामदास कदम यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकून चांगले असलेले राजकीय वातावरण बिघडवू नये. व आम्हाला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा यावेळी अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेतून रामदास कदम यांना दिला आहे.

You cannot copy content of this page