राजन तेली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनद्वारे केली मागणी…
⚡सावंतवाडी ता.०४-: शाळा मधील संच मान्यता निकष 15 मार्च 2024 चा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी वर्षा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना सादर केले यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की
दि. 28/08/2015 च्या शासन निर्णयाने शाळांच्या संच मान्यतेचे निकष निश्चित केलेले आहेत. यानुसार संच मान्यता चालू आहे.
आता दि. 15/03/2024 रोजी शासनाने संच मान्यतेसाठी नवीन शासन आदेश काढलेला आहे. या शासन निर्णयानुसार संच मान्यता आल्यास ग्रामीण भागातील विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापुर, ठाणे, पालघर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शाळांना शिक्षक मान्य होणार नाहीत. त्यामुळे शाळा बंद होतील आणि ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील. प्रत्येक वर्गात 20 पटसंख्या ही अट दि.15/03/2024 च्या शासननिर्णय (जी. आर) मध्ये आहे. त्यामुळे या निकषामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होतील, सदर शासननिर्णय (जी. आर) मध्ये 150 मुलांसाठी मुख्याध्यापक ही अट ठेवल्याने अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 125 शाळा मुख्याध्यापकांशिवाय राहतील. खरे तर शाळा तिथे मुख्याध्यापक असणे आवश्यक आहे. दि.28/08/2015 च्या शासननिर्णय (जी. आर) मध्ये 100 पटसंख्येला मुख्याध्यापक पद होते व पटसंख्या कमी झाल्यास मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण होते. परंतु दि. 15/03/2024 च्या शासननिर्णय (जी. आर) मध्ये 150 पेक्षा कमी पटसंख्या झाल्यास मुख्याध्यापक पद जाईल व सदर मुख्याध्यापकास वेतन श्रेणी दिली तरी शिक्षक पदावर समायोजित केले जाणार आहे. 25-30 वर्षे काम केलेल्या मुख्याध्यापकास शिक्षक म्हणून काम करणे म्हणजे चुकीचे होईल. तरी संच मान्यता निकष दि. 15 मार्च 2024 चा शासननिर्णय (जी. आर) रद्द करणेत यावा अशी विनंती राजन तेली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाला नामदार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
