हरी खोबरेकर यांचा घणाघात:भाजप सरकारने यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या..
⚡मालवण ता.२८-:
वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्याचा डाव सरकारने आखल्याचे समजल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या आमदार, खासदार व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी आवाज उठविल्यामुळेच सरकारला हा प्रकल्प वेंगुर्ले येथेच ठेवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत करून राज्यातील भाजपच्या गद्दार सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे दिवाळीपूर्वीची बंपर ऑफर असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे
मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेतर, महेंद्र म्हाडगुत, लारा देसाई, सचिन गिरकर, अक्षय रेवंडकर, सिद्धेश मांजरेकर, प्रवीण लुडबे, बंड्या सरमळकर, यशवंत गावकर, जयदेव लोणे, प्रसाद चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, राज्यातील भाजप सरकारने यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या आहेत. आता सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणाही फसव्या आहेत. अर्थसंकल्पात कोकणातील माड, आंबा, काजू बागायती व्यवसायिकांचा विचार केलेला नाही. शेतकऱ्यांना गृहीत धरून अर्थसंकल्प केलेला नाही. या अर्थसंकल्पात सौर ऊर्जेसाठी तरतूद असून कोकणातील चक्रीवादळे, वारा पाऊस यात सौर पॅनल तग धरणार का ? याठिकाणी भूमिगत वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. वीज बिलात माफी मिळावी, थकबाकीत सूट मिळावी अशी आमची मागणी आहे. कोकणातील मच्छिमारांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही भरीव तरतूद नाही, योजना नाही. येथील मच्छिमार, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक यांच्यासाठी महत्वाची असणारी आणि दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी महत्वाची असणारी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या सिंधुरत्न योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे सांगून श्री खोबरेकर म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या असून दोन महिने लोकांना भुलवण्यासाठी भूलभुलैय्या असलेला हा अर्थसंकल्प आहे, हा फसवा अर्थसंकल्प निवडणुकी पूर्वीचे गाजर आहे या भूलभुलैय्या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध करतो, असेही सांगितले.
जिल्ह्यात स्कुबा डायविंग स्कुलची घोषणा करण्यात आली असली तरी आज स्कुबा डायविंग व्यवसाय करताना व्यवसायिकांना अनेक जाचक अटीना सामोरे जावे लागते, कोणत्याही व्यवसायिकाला अधिकृत परवाना दिलेला नाही, व्यवसायिकांना परवाना देणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे, स्कुबा डायविंगचे पॉईंट निश्चित होणे महत्वाचे आहे, मात्र त्याबाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महिलांना सुरक्षित करण्याचे सोडून त्यांना आर्थिक गोष्टींकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाला आहे. अर्थसंकल्प फसवा असून यातून काही चुकीच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडू, काय चूक, काय बरोबर ते जनतेला आम्ही दाखवून देऊ, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
