मराठे कृषि महाविद्यालयातसेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग…

⚡कणकवली ता.०४-: कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण उपक्रम कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय यशस्वी प्रयोग करून दाखविला
विविध रासायनिक खते व कृत्रिम औषधे याचा वापर वाढला आहे त्याचा परीणाम हा माणसाच्या आरोग्यावर झाला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचे आरोग्य खराब होते तसेच मानवाला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे शिवाय रासायनिक खतांचा खर्च देखील भरमसाठ आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती हाच मोठा उपाय आहे. सेंद्रिय शेतीमध्ये या विद्यार्थ्यांनी मधुमका आणि भुईमूग या पिकांची लागवड केली आहे.
विद्यार्थी व सहाय्यक शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जमीन नांगरणी वेळी मातीमध्ये शेणखत, कोंबडी खत आणि गांडूळ खत मिसळले होते. पेरणी आधी बियाण्याला जैविक प्रकारे बीज प्रक्रिया केली. पेरणीनंतर सात ते चौदा दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी बियाण्याच्या उगवणीसाठी व पिकाच्या पुढील वाढीसाठी जीवामृत ची मात्रा दिली. दोन्ही पिकांचा कीड व रोगापासून बचाव करण्यासाठी अग्नीअस्त्र व निमास्त्राचा फवारा दर चौदा दिवसांनी केला. रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे.
सदर उपक्रमात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दर्शना कदम, विषय शिक्षक डॉ. लक्ष्मण व्यवहारे, प्राध्यापक ऋषिकेश कुबेर, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण भोकरे आणि संदेश ढवण यांचे मार्गदर्शन लाभले. सदर उपक्रम राबवण्यासाठी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ या संस्थेचे अध्यक्ष दीपेश मराठे, मिताली मराठे आणि विद्या राणे यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page