अन्यथा ९ फेब्रुवारी रोजी उपोषण:निरवडे येथील श्रीमती गावडे यांचा इशारा..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याने नागरिकांची कामे खोलंबली आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. तसेच याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करावी. या मागणीसाठी सावंतवाडी निरवडे येथील सौ श्रीमती लक्ष्मण गावडे हिने ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने ५ जानेवारी २०२३ रोजी बायोमॅट्रीक हजेरी लागू करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. मात्र याची अंमलबजावनी सिधुदुर्गात होताना दिसत नाही.
अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नागरिकांना बऱ्याचदा भेटत नाहीत. त्यामुळे गावातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा होतो. याला आवर घालण्यासाठी आता ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली लागू करण्यात यावी. त्यांना वेळेत हजर राहणे तसेच वेळे अगोदर कार्यालय न सोडणे असे बंधन लागू करावे. तरच कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चाप बसणार आहे.
गावामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे विकासाच्या दृष्टीकोनातून शासकीय योजना अंमलबजावणीसाठी एक राज्याचे फार मोठे महत्त्वाचे पद आहे. परंतु शासन निर्धारीत वेळेत ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी वेळेत हजरच राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या अनेक दिवस प्रलंबित राहतात, याचा सर्वाधिक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो.
ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी हे सर्वसाधारण ११.०० नंतरच कार्यालयात येतात तर ३.०० नंतर नॉट रिचेबल ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती असून पर्यवेक्षणिय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत हे याबाबत कोणतेही नियंत्रण ठेवत नाहीत. याचा फायदा संबंधित ग्रामसेवक घेत असल्याचे दिसून येत आहे.
गटविकास अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, मुख्य कार्यकारी अधिकारी हे याबाबत नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असल्याने अपहार, गैरव्यवहार या सारखी प्रकरणे वाढली आहेत. या अधिका-यांनी जर पारदर्शकता आणली असती तर आर्थिक गैरव्यवहार झाले नसते व ते कार्यालयात वेळेत उपस्थित राहीले असते. व जनतेची कामे वेळेत होऊ शकतील.
मात्र बरेच ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी हे कार्यालयीन वेळेत मुलांना शाळेत पोचविणे, मासे आणणे, शाळेतून मुलांना घरी घेवून जाणे, पती-पत्नी फेरफटका मारणे अशी कामे करताना दिसून येत आहेत,आणि हीच वस्तुस्थिती आहे. असे जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.
तरी शासनाच्या पत्रानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना तातडीने बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करुन अंमलबजावणी तातडीने करावी व आम नागरिकांची गैरसोय दूर करावी. या मागणीसाठी निरवडे येथील सौ श्रीमती गावडे यांनी ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
